सौरव गांगुलीचा मैदानाबाहेरही षटकार; BCCI चा बॉस' होणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 14, 2019

सौरव गांगुलीचा मैदानाबाहेरही षटकार; BCCI चा बॉस' होणार

https://ift.tt/32b7G7C
मुंबई: क्रिकेट विश्वावर स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) नवा बॉस होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. मुंबईत रविवारी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत गांगुलीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळं त्याची निवड निश्चित मानली जात आहे. अध्यक्षपदाच्या नावावरून बीसीसीआयमध्ये दोन गट पडले होते. माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर व एन. श्रीनिवासन यांच्या गटांनी आपापली नावं पुढं केली होती. या दोन्ही नावावरून अनेक अंगांनी चर्चा झाली. अखेर गांगुलीच्या नावावर सर्वसहमती झाली. अध्यक्षपदासाठी गांगुलीचं नाव पुढं येण्याआधी या नावासाठी चर्चेत असलेल्या कर्नाटकटचे ब्रिजेश पटेल यांच्यावर आयपीएलचे निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शाह हे बीसीसीआयचे सचिव म्हणून तर, अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुणसिंह ठाकूर हे कोषाध्यक्ष म्हणून काम पाहतील. आसाम क्रिकेट असोसिएशनचे देवजीत सैकिया यांचे नाव सहसचिव पदासाठी चर्चेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव गांगुली आजच अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळं येत्या २३ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेली बीसीसीआयची नियोजित वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द होण्याची चिन्हे आहेत. पडद्यामागे नाट्यमय घडामोडी अध्यक्षपदी गांगुलीचे नाव निश्चित होण्याआधी पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या. मंडळाचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन याचा गट ब्रिजेश पटेल यांच्या नावासाठी आग्रही होता. पटेल यांचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून श्रीनिवासन यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली. त्याच दिवशी गांगुलीनंही शहा यांची भेट घेऊन अध्यक्षपदात रस असल्याचं सांगितलं. अनुराग ठाकूर यांचा गट गांगुलीच्या पाठिशी असल्याचं बोललं जातं. अखेर गांगुलीच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. १० महिन्याचा कार्यकाळ मिळणार गांगुलीला अवघ्या १० महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. मात्र, गांगुलीला प्रशासकीय कामकाजाचा उत्तम अनुभव आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनची धुराही त्यानं यशस्वीरित्या सांभाळली आहे. सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या प्रशासाकीय समितीमुळं क्रिकेटची घडी विस्कटल्याचा अनेकांचा आरोप आहे. ही घडी पुन्हा बसविण्यासाठी गांगुलीसारखा प्रशासक हवा, असं अनेकांचं मत होतं. त्यातूनच त्याचं नाव पुढं आल्याचं सूत्रांकडून समजतं. नव्या पर्वाची सुरुवात गेल्या अनेक वर्षांपासून बीसीसीआयवर प्रत्यक्ष क्रिकेटशी संबंध नसलेल्या लोकांचा वरचष्मा राहिला आहे. शरद पवार, एन. श्रीनिवासन, अनुराग ठाकूर अशा अनेक राजकीय व अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी बीसीसीआयचं अध्यक्षपद भूषवलं आहे. गांगुलीच्या रूपानं पुन्हा एकदा क्रिकेटपटू बीसीसीआयची धुरा हाती घेतो आहे. त्यामुळं बीसीसीआयमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात होईल, अशी आशा आहे.