
मुंबई: 'युतीच्या जागावाटपात १२४ जागा घेऊन तडजोड केलेली नाही. एकाकी लढायचं असेल तर शिवसेना कधीही लढू शकते. पण मी भाजपची अडचण समजून घेतलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तशी विनंती केली होती. मी त्यांना समजून घेतले,' अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी युतीतील जागावाटपाचं विश्लेषण केलं आहे. 'सामना ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत उद्धव बोलत होते. विधानसभा निवडणुकीत युती करताना कमी जागा घेऊन शिवसेनेला छोट्या भावाची भूमिका घ्यावी लागली आहे. त्यावरून राजकीय चर्चेला ऊत आला आहे. त्याच अनुषंगानं संजय राऊत यांनी उद्धव यांना प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना, 'महाराष्ट्राच्या हितासाठी मी युती केलीय. भाजपला समजून घेतलेय. महाराष्ट्राला हे माहीत आहे. महाराष्ट्र हा काही धृतराष्ट्र नाही,' असं उद्धव म्हणाले. युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला कमी जागा आल्या आहेत असं आता दिसत असलं तरी हे चित्र तात्कालिक आहे. जागांचा आकडा लहान असला तरी आमदारांचा आकडा मोठा असेल. शिवसेनेच्या इतिहासातील सर्वाधिक आमदार यावेळी निवडून येतील. शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून येण्याची ही पहिलीच वेळ असेल,' असा विश्वास उद्धव यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात व्यक्त केला. लोकसभेला ठरलेला ५०:५० चा करार मोडला असं वाटतं का असं विचारलं असता उद्धव म्हणाले, 'अधिकार व जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप हा मुद्दा युतीमध्ये महत्त्वाचा आहे. येत्या २४ तारखेला युतीचं सरकार सत्तेवर येईल तेव्हा समसमान वाटप काय असतं हे लोकांना कळेल.' राम मंदिर उभारावंच लागेल! 'राम मंदिर हे उभारावंच लागेल. त्यामागे कोणाला काय राजकारण करायचं आहे ते करो. पण आम्ही तो विषय सोडणार नाही. त्यामुळंच आम्ही अयोध्येत गेलो होतो. पंतप्रधानांनी आम्हाला थोडं थांबायला सांगितलं आहे. थोडं थांबतो,' असं उद्धव म्हणाले. आदित्यला लादणार नाही! 'शिवसेनेसाठी आदित्य माझ्यापेक्षा अधिक मेहनत घेतोय. बाळासाहेबांकडूनच त्यालाही हे 'बाळकडू' मिळालेत. 'जन आशीर्वाद' यात्रेतून त्यानं शंभर-सव्वाशे मतदारसंघ पालथे घातलेत. अशा तरुणांना संधी मिळायला हवी. माझा मुलगा म्हणून मी त्याला शिवसैनिकांवर लादणार नाही,' असं उद्धव म्हणाले. शिवसेनेचा मुख्यमंत्री भाजपला पटेल का? शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाबाबतही उद्धव यांनी भाष्य केले. 'महाराष्ट्राच्या विधानभवनात मी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणार हे वचन मी बाळासाहेबांना दिलंय. ते कुणाला पटो न पटो. मी कुणालाही विचारून ते दिलेलं नाही. त्यामुळं ते वचन पूर्ण करणारच,' असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.