
नागपूर: महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यात नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुंबईत पीयूष गोयल, राष्ट्रवादी कांग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बारामतीत मतदान केले. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यांनी मतदानाला ७ वाजता सुरुवात होताच नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांना भारतरत्न देण्याच्या मागणीवरून काँग्रेसने आरएसएसवर केलेल्या टीकेवर उत्तर दिले. आम्हाला गेल्या ९० वर्षांपासून लक्ष्य केले जात असून, याची आता आम्हाला सवय झालीय. यात चिंता करण्यासारखे काहीही नाही. हे राजकारण आहे आणि यात सर्वकाही चालते, अशी प्रतिक्रिया भागवतांनी व्यक्त केली. भारतीय समाज हा एक असून तो कायम एकच राहणार आहे हे सर्वांनी लक्षात ठेवणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. 'लोकांनी मुद्द्यांवर मतदान करावे' राज्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडावे आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा, असेही आवाहनही यावेळी भागवत यांनी केले. आपले प्रतिनिधी निवडणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. आम्ही तर १०० टक्के मतदानावर भर देत आहोत. मुद्द्यांवर मतदान करा, व्यक्ती किंवा वातावरणानुसार मतदान करू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय मुद्दे प्रभावी वाटत आहेत, मात्र या मुद्द्यांचा या निवडणुकीवर किती परिणाम होईल, असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारल्यानंतर भागवत म्हणाले की, 'याचा अंदाज बांधणे कठीण आहे. मी राजकीय व्यक्ती नाही आणि मतदान झाल्यानंतर ३ दिवसांनी सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.' आज महाराष्ट्र राज्यातील सर्व, २८८ विधानसभेच्या जागांसाठी मतदान होत आहे. आज सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाले. त्या नंतर तासाभरात राज्यातील मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी वाढू लागली आहे. सकाळी ७ वाजता सुरू झालेले मतदान संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.