विधानसभा निवडणूक: छगन भुजबळ यांनी मतदान का केलं नाही? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 22, 2019

विधानसभा निवडणूक: छगन भुजबळ यांनी मतदान का केलं नाही?


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केलं नाही. दरवर्षी सकाळी मतदान करून मग मतदारसंघात फिरणाऱ्या भुजबळांनी यंदा मात्र मतदानाकडे पाठ फिरवली.

छगन भुजबळ हे 2004 पासून येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करत आहेत. यंदा येवल्यातून भुजबळांच्या विरोधात शिवसेनेकडून संभाजी पवार यांच्या रूपानं तगडं आव्हान आहे. निवडणुकीतील उमेदवार म्हणून येवला हा छगन भुजबळांचा मतदारसंघ असला, तरी त्यांचं मतदान नाशिक पश्चिम मतदारसंघात आहे. सिडको भागातल्या ग्रामोदय मतदान केंद्रावर दरवर्षी भुजबळ कुटुंबीय मतदान करतात आणि दौऱ्यावर निघतात. यंदा मात्र हे चित्र दिसलं नाही. विशेष म्हणजे, छगन भुजबळांचे पुत्र आणि नांदगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पंकज भुजबळ यांनीही मतदान केलं नाही. तेही नांदगावमध्येच तळ ठोकून होते.अगदी मतदानाची वेळं संपेपर्यंत भुजबळ नाशिक पश्चिममध्ये फिरकले नाहीत आणि मतदानाचा हक्कही बजावला नाही.


भुजबळांसमोर येवल्यात तळ ठोकून राहण्याएवढं आव्हान?

भुजबळ नाशिक पश्चिममध्ये जाऊन मतदान न करता, येवल्यात तळ ठोकून का बसले, हा साहजिक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी सकाळी नाशिकमध्ये मतदान केले आणि त्यानंतर ते मतदारसंघात गेले होते.'सकाळ'चे उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने म्हणतात, "येवल्यात छगन भुजबळांसमोर नक्कीच आव्हान आहे. लोकसभेत समीर भुजबळांचा पराभव झाल्याने ते आता विधानसभेला रिस्क घेऊ इच्छित नसल्याचे दिसतात."

"माणिकराव शिंदे यांच्यासारखे भुजबळांचे निकटवर्तीय नेते दूर गेलेत. शिवाय गेल्या तीन वर्षात विविध संकटं त्यांना आली. वातावरण प्रतिकूल असल्यानं मतदारसंघात थांबले असावेत," असा अंदाज श्रीमंत माने व्यक्त करतात.
तर वरिष्ठ पत्रकार दीप्ती राऊत सांगतात, "नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून गेलेत, 15 वर्षे भुजबळ आमदार असल्यानं प्रस्थापितविरोधी जनभावना, तुरूंगात जाऊन आल्यानं प्रतिमा मलीन इत्यादी अनेक प्रतिकूल गोष्टी भुजबळांसमोर असल्यानं आव्हान मोठं आहे."

भुजबळ मतदान करून येऊ शकले नसते का?

जाण्या-येण्याचा मार्ग आणि त्यात जाणार वेळ हे एक कारण असलं तरी येवला, नांदगावात तळ ठोकून राहण्याला काही राजकीय अंग सुद्धा आहेत. त्याबाबत श्रीमंत माने म्हणतात, "भुजबळांनी मांजरपाड्याचं पाणी येवला, नांदगावात आणलं. त्यानंतर ते गेले दोन महिने सातत्यानं कॅनलवर फिरतायत, आजूबाजूच्या गावांमध्ये जात होते. मतदानाच्या दिवशी त्यांचा चेहरा समोर दिसला, तर लोकांना केलेलं काम आठवेल, असा तर्क यामागे असावा."