चंद्रपूरः महाराष्ट्रात सध्या जे राजकारण सुरू आहे. तसेच काल ज्या राजकीय नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या हे पाहून चंद्रपूरमधील एका प्राध्यापकाला ताप भरला आहे. इतकच नव्हे तर ते चक्क आजारी पडले आहे. राजकारणामुळे आपल्या मनावर परिणाम झाला असून आपल्याला महाविद्यालयीन प्रशासनाने सुट्टी मंजूर करावी यासाठी त्यांनी अर्ज केला. परंतु, महाविद्यालयाने त्यांचा अर्ज नामंजूर केला आहे. त्यांचा हा अर्ज सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
जहीर सय्यद असे या प्राध्यापकाचे नाव असून ते इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. चंद्रपूरमधील गढचंदूर महाविद्यालयात ते प्राध्यापक आहेत. परंतु, महाराष्ट्रातील निवडणुकीनंतरचे राजकारण पाहून ते चक्रावून गेले आहेत. त्यांनी महाविद्यालय प्रशासनाकडे सुट्टीसाठी केलेला अर्ज सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शनिवारी सकाळी महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप झाला. शनिवारी सुट्टीचा दिवस असल्याने अनेक जण झोपेत असतानाच भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात सकाळच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी शपथ घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असताना भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केले असून काही आमदारांना सोबत घेऊन भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कालपासून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.