
मुंबई मुख्यमंत्रिपदाच्या तिढ्यावरुन भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतलेले शिवसेनेचे नेते यांनी आज पुन्हा एकदा ट्विटच्या माध्यमातून भाजपवर हल्लाबोल केला आहे. राऊत यांनी यावेळी भाजपचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेची आठवण भाजपला करुन दिली आहे. 'आग्नेय परीक्षा की इस घड़ी में- आइए, अर्जुन की तरह उद्घोष करें :‘‘न दैन्यं न पलायनम्।’’, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. न दैन्यं न पलायनम् हा गीतेमधला संदेश असल्याचं राऊत यांनी ट्विटच्या शेवटी म्हटलं आहे. वाजपेयींच्या या संदेशातून राऊत यांनी भाजपच्या सध्याच्या राज्य नेतृत्त्वावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. अग्निपरीक्षेच्या काळात अर्जुनाप्रमाणे उद्घोष केला पाहिजे. आव्हानांपासून पळून न जाता लढलं पाहिजे, असा संदेश असणारं हे ट्विट आहे. या ट्विटच्या माध्यमातून राऊत यांनी आम्ही अटलजींच्या मार्गावर असल्याचं भाजपला दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, सत्ता संघर्षाचा आज १६ वा दिवस आहे. राऊत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पत्रकार परिषद आणि ट्विटच्या माध्यमातून भाजपवर टीका करताना दिसत आहेत. आज राज्याच्या १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. यानंतर आता राज्यपालांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. राज्यपाल कोणत्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर शिवसेनेच्या भुमिकेवरही सर्वांचं लक्ष असणार आहे. आपले आमदार फुटू नयेत याची काळजी घेत शिवसेनेने सर्व आमदारांना मुंबईतील रंगशारदा हॉल येथे ठेवलं आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, अशी ठाम भूमिका सेनेने कायम ठेवली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गुरूवारी साताऱ्याच्या दौऱ्यावरून मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानंतर राज्यातील राजकीय स्थिती लक्षात घेता आपला कोकण दौरा रद्द केला आहे. त्यामुळे पवार आज काय खेळी खेळणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. काँग्रेसनेही आपले आमदार भाजपच्या गळाला लागणार नाहीत याची खबरदारी म्हणून सर्व आमदारांना जयपूर हलवण्याची तयारी सुरू केली आहे.