
मुंबईः मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईन... असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आज हे खरं करून दाखवलं. आज सकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना येत्या ३० नोव्हेंबर रोजी बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. राज्याच्या विधानसभेत २८८ जागा असून फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १४५ हा जादुई आकडा गाठावा लागणार आहे. राज्याच्या निवडणूक निकालानंतर सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला १०५ जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीआधी भाजपने अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिले होते असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. परंतु, हा दावा भाजपने फेटाळून लावल्याने शिवसेना-भाजप यांच्यातील युती संपुष्टात आली.