
बेंगळुरू: एकीकडे कांद्याच्या किंमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले असताना, दुसरीकडे याच कांद्याने एका कर्जबाजारी शेतकऱ्याला करोडपती बनवले आहे. मल्लिकार्जुन असे या शेतकऱ्याचे नाव असून तो कर्नाटकमधील चित्रदुर्ग जिल्ह्यातील डोड्डासिद्वावनहल्ली येथील रहिवासी आहे. कांद्याच्या किंमती वाढल्यानंतर मल्लिकार्जुन महिन्याभरात करोडपती झाले. इतकेच नाही, तर परिसरातील शेतकऱ्यांसाठी मल्लिकार्जुन एक आदर्श बनले आहेत. आता लोक त्यांच्याकडे शेतीतील टिप्स घेण्यासाठी येऊ लागले आहेत. ४२ वर्षीय मल्लिकार्जुन यांनी कर्ज काढून कांद्याची शेती केली होती. कर्ज काढून मी सर्वात मोठो धोका पत्करला होता. जर माझे पीक वाया गेले असते, तर मी दुष्टचक्रातच फसलो असतो. मात्र, याच कांद्याने आता माझ्या कुटुंबाचे भाग्यच बदलले आहे, अशी प्रतिक्रिया मल्लिकार्जुन यांनी व्यक्त केली आहे. २४० टन कांद्याने बदलले भाग्य मल्लिकार्जुन यांनी एकूण २४० टन पिकवला. जेव्हा कांद्याची किंमत २०० रुपये प्रति किलो होती तेव्हा मल्लिकार्जुनना सहाजिकच मोठा फायदा झाला. तथापि, आपण १५ लाख रुपये गुंतवल्यामुळे आपल्याला जास्तीतजास्त ५ ते १० लाख रुपयांचा लाभ होईल असे मल्लिकार्जुन यांना वाटत होते. मात्र, कांद्याच्या किंमती कितीतरी पटींनी वाढल्यामुळे त्यांना मोठा फायदा झाला. मल्लिकार्जुन खरेदी करणार शेतजमीन मल्लिकार्जुन आता बेंगळुरूपासून २०० किमी अंतरावर असलेल्या चित्रदुर्गमध्ये शेती क्षेत्रातील सेलिब्रिटी बनले आहेत. तेथील सर्वच शेतकरी त्यांना आपला आदर्श मानतात. या फायद्यानंतर मल्लिकार्जुन यांनी त्यांचे सर्व कर्ज फेडले आहे. आता त्यांना एक सुंदरसे घर बांधायचे आहे. शिवाय आता त्यांना आपल्या शेतीचा विस्तार करायचा असून त्यासाठी ते जमीनही खरेदी करत आहेत. २००४ पासून करताहेत कांद्याची शेती मल्लिकार्जुन यांच्याकडे १० एकर इतकी जमीन आहे. याबरोबरच त्यांनी एकूण ५० मजूर कामावर ठेवले. पावसाळ्यात ते नेहमीच कांद्याचे पीक घेत असतात. त्यांनी सन २००४ पासून कांद्याची शेती करायला सुरुवात केली. सुरुवातीला झाले नुकसान, मात्र हार मानली नाही मल्लिकार्जुन यांनी कांद्याच्या पिकासाठी मोठे श्रम घेतले. याच जोरावर ते करोडपती बनले आहेत. मात्र, त्याचा करोडपती बनण्याचा प्रवास नक्कीच सोपा नाहीए. गेल्या वर्षी त्यांना फक्त ५ लाखांचा नफा मिळाला. इतके उत्तन्न त्यांच्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी पुरेसे होते असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांनी आणखी अतिरिक्त जमीन पट्ट्यावर घेत २० लाख रुपयांचे कर्जही घेतले. मात्र तेव्हा दुर्दैवाने त्याना नुकसान झाले. मात्र, त्यांनी हार मानली नाही. त्यांच्याकडे असलेल्या ५ लाख रुपयांचा उपयोग करून त्यांनी पुन्हा कांद्याची लागवड केली आणि त्यांचे भाग्यच बदलून गेले.