नवी दिल्ली: दिल्ली आणि एनसीआरमध्ये दोन ते चार लपून बसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रजासत्ताक दिनी किंवा त्याआधी दिल्लीत 'घात' करण्याचा त्यांची योजना असू शकते, असं सांगितलं जात आहे. एखाद्या पोलीस अधिकाऱ्यालाही लक्ष्य केलं जाऊ शकतं. २०१४ मध्ये तामिळनाडूत हिंदू नेते के. पी. सुरेश यांची हत्या केली होती. सध्या अटकेत असलेल्या तीन संशयित दहशतवाद्यांच्या साथीदारांनी अलीकडेच एका पोलीस ठाण्यात घुसून उपनिरीक्षकाची हत्या केली होती. आता दिल्ली हे त्यांचं पुढील लक्ष्य आहे, अशी माहिती उघड झाली आहे. ख्वाजा मोइनुद्दीन, सैयद अली नवाज आणि अब्दुल समद उर्फ नूर अशी पकडल्या गेलेल्या संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत. हे तिघेही तामिळनाडूचे रहिवासी आहेत. या तिघांची कसून चौकशी करण्यात आली. त्यांना दिल्लीत घातपात घडवण्यासाठी पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी चौकशीत दिली आहे. त्यांना 'टार्गेट' देण्यात येणार होते. कधी, काय करायचं हे विदेशी हस्तक ठरवत असल्याची माहितीही त्यांनी चौकशीतून दिली. यांच्या अजून एका साथीदाराला गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्याच्याकडून आणखी महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. जफरकडून त्यांना शस्त्रसाठा पुरवला जात असल्याची माहिती हाती लागली आहे. सहा जणांची ही टोळी असून, त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. अद्याप तिघे फरार आहेत. दोन प्रमुख हस्तक आणि दोन ते तीन जण असू शकतात. ते त्यांना शस्त्रपुरवठा किंवा पैसा पुरवत असल्याची माहिती मिळते. त्यातील एकाला गुजरात पोलिसांनी पकडलं आहे. दिल्लीच्या स्पेशल सेलनं पकडलेल्या तिघांची चौकशी सुरू आहे. मात्र, भाषेची अडचण येत असल्याचं सांगण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत त्यांच्या एक ते दोन साथीदारांना अटक करण्यात येईल, असं सांगितलं जात आहे. दरम्यान, दिल्ली अलर्टवर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.