मुंबईत फक्त ५ रूपयांसाठी रिक्षाचालकाची हत्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 26, 2020

मुंबईत फक्त ५ रूपयांसाठी रिक्षाचालकाची हत्या

https://ift.tt/3a4yzgT
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: रिक्षामध्ये सीएनजी भरून झाल्यानंतर उरलेले पाच रूपये मागितल्याच्या रागातून रिक्षाचालकाची पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी हत्या केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी बोरीवली येथे घडली. रामदुलार सरजू यादव (६८) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी पाच जणांना अटक केली. रिक्षामध्ये गॅस भरण्यासाठी रामदुलार यादव मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास बोरीवली पूर्वेकडील मागाठणे पोलीस चौकीजवळील पेट्रोल पंपावर गेला. सीएनजी गॅस भरून झाल्यानंतर रामदुलार याने येथील कर्मचाऱ्याला पैसे दिले. रामदुलार याने दिलेल्या पैशातून पाच रूपये शिल्लक राहत होते. रामदुलार याने गॅस भरणाऱ्याकडे पाच रूपये परत मागितले. सुट्टे नसल्याचे कारण देऊन त्याने पाच रूपये परत करण्यास नकार दिला. यावरून रामदुलार आणि येथील कर्मचाऱ्यांमध्ये भांडण झाले. काही वेळातच या भांडणाचे पर्यावसन हाणामारीत झाले. रामदुलार याला मारण्यासाठी पेट्रोल पंपावर कर्माचारी एकत्र आले. चार ते पाच जणांनी मिळून रामदुलार याला जबर मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. हत्येचा गुन्हा दाखल करून कस्तुरबा मार्ग पोलिसांनी पेट्रोलपंपावरील पाच कर्मचाऱ्यांना अटक केली. रामदुलार हा नालासोपारा येथे कुटुबासोबत राहत होता.