औरंगाबादमध्ये करोनामुळे तिघांचा मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 17, 2020

औरंगाबादमध्ये करोनामुळे तिघांचा मृत्यू

https://ift.tt/3dNiFcw
औरंगाबाद: : औरंगाबादमध्ये आज ५७ नव्या रुग्णांची भर पडलेली असतानाच करोनावर उपचार घेत असलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या २९वर पोहोचली आहे. आज सकाळी एका३५ वर्षीय करोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला, तर आणखी एका ५२ वर्षीय महिलेचा व ३२ वर्षीय तरुणाचा शनिवारी संध्याकाळी व रात्री उपचारादरम्यान घाटीमध्ये मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या १४ तासांमध्ये तीन करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी करोना बाधितांच्या मृत्यूची संख्या २९ झाली आहे. करोनाबाधित असलेल्या ३५ वर्षीय महिलेचा रविवारी सकाळी सहा वाजता उपचारादरम्यान घाटीमध्ये मृत्यू झाला. तसेच संजयनगरातील ५२ वर्षीय करोनाबाधित महिलेचा १६ मे रोजी सायंकाळी ७ वाजून ४५ ‍मिनिटांनी मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब, दम्याचा त्रासही होता. तर, औरंगाबादच्या जलाल कॉलनी येथील ३२ वर्षे तरुणाला १५ मे रोजी रात्री ११ वाजता घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला रुग्णालयात दाखल करताना त्याच्या शरीरातील प्राणवायुचे प्रमाण ७५ टक्के होते. त्याच दिवशी त्याचा लाळेचा नमुना (स्वॅब) घेण्यात आला होता व दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे संबंधीत तरुण हा करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र दोन्ही फुफ्फुसांचा न्यूमोनिया तसेच इतर व्याधींमुळे त्याचा उपचारादरम्यान शनिवारी रात्री नऊ वाजता मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या २७ झाली आहे, तर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ९०१ झालेली आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यातील २५५ करोनाबाधित हे करोनामुक्त होऊन उपचाराअंती घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, अमरावतीतही आज दोन जणांना करोनाची लागण झाली. करोनाची लागण झालेले दोन्हीजण एसआरपीएफचे जवान असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.