महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या डोक्यावर परिणाम झालाय: शिवसेना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 22, 2020

महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या डोक्यावर परिणाम झालाय: शिवसेना

https://ift.tt/3cUzUIX
मुंबई: 'महाराष्ट्रातील भाजपला जनतेने त्यांना सत्तेच्या अंगणातून हाकलून दिले आहे. भाजपवाले काही करू किंवा बोलू लागताच लोक त्यांना 'मेरे, आंगने में तुम्हारा क्या काम है?' असं विचारतात. यातून त्यांना वैफल्य आले असून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे,' अशी घणाघाती टीका शिवसेनेनं केली आहे. (Shiv Sena Slams Maharashtra BJP) करोनाची परिस्थिती हाताळण्यात उद्धव ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपनं सरकारविरोधात आंदोलन पुकारलं आहे. 'राज्यातील जनतेनं शुक्रवारी आपापल्या घराबाहेर पडून काळे मास्क, काळे शर्ट, काळी रिबीन, काळे बोर्ड घेऊन राज्य सरकारचा निषेध करावा,' असं आवाहन भाजपनं केलं आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपच्या या आंदोलनाचा जोरदार समाचार घेतला आहे. 'सारा देश करोनाविरुद्ध लढ्यात झोकून देऊन काम करीत असताना महाराष्ट्रातील भाजपला फालतू आंदोलनाचे डोहाळे लागले आहेत,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावरही टीका केली आहे. अग्रलेखातील ठळक मुद्दे: >> प्रदेश भाजपचे ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ म्हणजे नेमके काय? ठाकरे सरकारच्या हाती महाराष्ट्र सुरक्षित असल्याची भावना जनतेची आहे. त्यामुळे सध्याच्या उठवळ विरोधी पक्षापासूनच महाराष्ट्राला वाचवा असे सांगण्याची वेळ आली आहे. >> चंद्रकांत पाटील व इतर अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या डोक्यावरचे केस साफ पांढरे होऊन त्यांची चांदी झाली आहे. मग आता त्या केसांना काळा कलप लावून ते अंगणातील रणांगणात उतरणार काय? महाराष्ट्र भाजपचा आदेश आहे की सर्वच काळे करा. हा सर्वच प्रकार म्हणजे येड्यांची जत्रा आहे. >> कोरोना युद्धाचे नेतृत्व पंतप्रधान मोदींकडेच आहे व राहील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. हे जर भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या पचनी पडत नसेल तर त्यांनी खुशाल आंदोलन करावे. मात्र हे आंदोलन त्यांच्याच नेत्यांच्या विरोधात ठरेल हे त्यांनी लक्षात ठेवावे. >> महाराष्ट्रात करोनाच्या निमित्ताने नवे प्रश्न निर्माण झाले आहेत व सरकार त्या प्रश्नांशी झगडत आहे. महाराष्ट्र राज्य हे विरोधी पक्षाच्या नेत्यांना आपले वाटत असेल तर त्यांनी प्रश्न सोडविण्याच्या कामी राज्य सरकारला सहकार्य केले पाहिजे. राज्यपालांच्या ‘अंगणात’ लोळण घेण्यापेक्षा राज्याचे प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यांच्या घरात येऊन चर्चा केली पाहिजे. >> राज्याच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला विरोधी पक्षाला लाज वाटते की त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे? महाराष्ट्रात करोना लढाईत सगळेच काम करीत आहेत. रुग्ण वाढत आहेत तसे रुग्ण कोरोनामुक्तही होत आहेत. आतापर्यंत दहा हजार रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची नोंद आहे हे कसले लक्षण आहे? >> कोरोना योद्ध्यांवर अविश्वास दाखवून भाजपला काय साध्य करायचे आहे? ही वेळ लढण्याची, वाद उगाळण्याची नाही, असे पंतप्रधान मोदी यांचे सांगणे आहे, पण महाराष्ट्र भाजपचे नेमके पंतप्रधान मोदी यांच्या उलट सुरू आहे. ही कसली शिस्त म्हणायची? >> पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या सूचनेवरून पाटील-फडणवीस मंडळ महाराष्ट्रात स्वत:चेच तोंड काळे करण्याचे आंदोलन करीत आहेत असे वाटत नाही. ही आंदोलनाची मूळव्याध त्यांची त्यांनाच उपटलेली दिसते. >> महाराष्ट्र प्रकाशमान, तेजस्वी करण्याचे युद्ध सुरू असताना राज्य ‘काळे’ करण्याचे आंदोलन सुरू झाले आहे. डोमकावळ्यांचे हे फडफडणे औट घटकेचेच ठरेल, याविषयी आमच्या मनात शंका नाही. पाटील-फडणवीसांनी भान राखून वागावे-बोलावे. शहाण्यांना शब्दांचा मार पुरेसा असतो, पण विरोधकांत शहाणपण उरले आहे काय?