ईडी, सीबीआयसारख्या राजकीय संस्थांचं लॉकडाऊन करा: शिवसेना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 14, 2020

ईडी, सीबीआयसारख्या राजकीय संस्थांचं लॉकडाऊन करा: शिवसेना

https://ift.tt/3fMF4Zp
मुंबई: 'उद्योगपती पळून जाणे हे नव्या आत्मनिर्भरतेकडे जाणार्‍या भारताला परवडणारे नाही. उद्योजक, व्यापारी यांना टिकवून ठेवावे लागेल. त्यासाठी दहशत निर्माण करणार्‍या , सीबीआयसारख्या ‘राजकीय’ संस्थांचे काही काळ ‘लॉकडाऊन’ करावे लागेल,' असा सल्ला शिवसेनेनं मोदी सरकारला दिला आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान यांनी अर्थव्यवस्थेसाठी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. हे पॅकेज जाहीर करताना मोदींनी ही संकल्पना मांडली आहे. पंतप्रधानांच्या या घोषणेबाबत शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे. 'करोनाआधीच आपली अर्थव्यवस्था खचली होती. एअर इंडिया, भारत संचार निगमसारखे मोठे सरकारी प्रकल्प मरायला टेकले होते. त्यांना जिवंत ठेवण्यासाठी चारेक हजार कोटींचे आर्थिक पॅकेज द्यायचीही सरकारची ऐपत नव्हती. जेट विमान कंपनीस तातडीने ५०० कोटींचा आधार दिला असता तर तो उद्योग व तेथील लोकांच्या नोकर्‍या वाचल्या असत्या. मग आता २० लाख कोटी सरकार कोठून जमा करणार,' असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे. पंतप्रधानांनी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर करूनही शेअर बाजाराच्या बैलाने साधे शेपूटही का हलवले नाही? कारण भांडवलदार, गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत आहेत. त्यांना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी विश्वास आणि अभय दिलेच पाहिजे. उद्योगपती, व्यावसायिक, व्यापारी यांनी गुंतवणूक करावी, असा माहोल आता निर्माण व्हायला हवा. त्यासाठी दहशत निर्माण करणार्‍या ईडी, सीबीआयसारख्या ‘राजकीय’ संस्थांचे काही काळ ‘लॉक डाऊन’ करावे लागेल,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. काळ्या पैशाच्या मुद्द्यावरूनही शिवसेनेनं सरकारला टोला हाणला आहे. 'देशाबाहेर काळा पैसा आहे, तो आणावा व गरिबांना वाटावा अशी एक स्वप्न योजना मोदी यांनी मांडली होती. त्यावर काम करण्याची संधी करोना संकटाने दिली आहे,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. आता भारत स्वावलंबी नाही काय? आत्मनिर्भर भारताच्या मोदींच्या नव्या संकल्पनेवर शिवसेनेनं आश्चर्य व्यक्त केलं आहे. आता भारत स्वावलंबी नाही काय, असा प्रश्न अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे. 'स्वातंत्र्यापूर्वी देशात एक ‘सुई’सुद्धा बनत नव्हती. स्वातंत्र्यानंतर पुढच्या साठ वर्षात हिंदुस्थान अनेक क्षेत्रांत आत्मनिर्भर झाला. विज्ञान, तंत्रज्ञान, शेतीउद्योग, संरक्षण, उत्पादन, अणू विज्ञान यात तो झेपावला. आज पीपीई किटस् बनविणार्‍या आयसीएमआरसारख्या विज्ञान संस्था याच आत्मनिर्भर हिंदुस्थानच्या भाग आहेत. तेव्हा पंडित नेहरू होते, आज मोदी आहेत. राजीव गांधी यांनी डिजिटल इंडियाचा पायाच घातला नसता तर आज करोना संकटातील ‘अस्पृश्य’ काळात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान, मुख्यमंत्री, अधिकारीवर्गाचा संवाद होऊ शकला नसता,' अशी खोचक टिप्पणीही करण्यात आली आहे.