मुंबई : सरकारने देशातील 'MSME'उद्योजकांसाठी ३ लाख कोटींचे विनातारण हमी कर्ज उपलब्ध केले आहे. यामुळे ४५ लाख 'MSME'ला याचा फायदा होईल. आज सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानाच्या २० लाख कोटींच्या पॅकेजमधील १५ महत्वाच्या घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी जाहीर केल्या होत्या. मात्र त्याचा भांडवली बाजारावरील प्रभाव कमी होत गेला. गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. आजच्या सत्रात आयटीसी , हिंदुस्थान युनिलिव्हर, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज , टीसीएस, बजाज ऑटो, हिरो मोटो कॉर्प या शेअरमध्ये घसरण झाली आहे. तर बजाज फायनान्स, नेस्ले, भारती एअरटेल या शेअरमध्ये तेजी दिसून आली. दरम्यान आशियातील प्रमुख भांडवली बाजारात आज मोठी घसरण दिसून आली. हॅंगसेंग, निक्केई, स्ट्रेट टाइम्स आदी निर्देशांक घसरले. तर अमेरिकेच्या शेअर निर्देशांकात २ टक्क्यांची घसरण झाली होती. बुधवारी दोन्ही शेअर बाजार वरच्या पातळीवर बंद झाले होते. सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) १४७०.७५ अंकांनी आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ३८७.६५ अंकांनी वरच्या पातळीवर उघडला. मात्र, बाजार बंद होताना सेन्सेक्स ६३७.४९ अंकांनी वधारून ३२,००८.६१च्या पातळीवर आणि निफ्टी १८७ अंकांनी वधारून ९,३८३.५५च्या पातळीवर पोहोचला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी जाहीर केलेले पॅकेज देशाच्या एकूण जीडीपीच्या जवळपास १० टक्के आहे. स्वावलंबी भारत अभियानात या पॅकेजचे महत्त्वपूर्ण योगदान राहणार आहे. एंजल ब्रोकिंगचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की 'पंतप्रधानांनी २० लाख कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज घोषित केले, हे खरोखरच योग्य दिशेने टाकलेले स्वागतार्ह पाऊल आहे.