अहमदनगर: लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्याने राज्याच्या विविध जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले आहे. रेड झोनमधील नागरिक अन्य क्षेत्रात आल्यानंतर करोना बाधित आढळून येत असल्याने इकडचे आकडे वाढत आहेत. प्रशासनानं त्यावर एक उपाय शोधून काढला आहे. रेड झोनमधून आलेल्या बाधितांची गणना नगरच्या यादीत न करता ते ज्या शहरातून आले, तिथेच केली जाणार आहे. सुरुवातीपासूनच रुग्ण संख्या नियंत्रित ठेवलेल्या नगर जिल्ह्यात आता रुग्ण वाढू लागले आहेत. आता ही संख्या ८० वर गेली आहे. मात्र, यातील बहुतांश रुग्ण पुणे किंवा मुंबईहून आलेले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेले नातेवाईकांनाही नंतर बाधित होत असल्याचे दिसून येत आहे. प्रवास करून येथे आल्यानंतर लक्षणे आढळून आल्यानंतर अगर थेट मृत्यू झाल्यानंतर हे रुग्ण उघड होत आहेत. यामुळे नगर जिल्ह्याची संख्या वाढत असून जिल्ह्यातील नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक पहाता या व्यक्ती अन्य शहरांतून येथे आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांची गणना नगर जिल्ह्यातील रुग्ण संख्येत न करण्याची पद्धत जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. श्रीगोंद्यात करोनाचा शिरकाव ठाणे महापालिका प्रशासनाने तपासणीसाठी स्वॅब घेतल्यानंतर एक महिला त्याचा वैद्यकीय अहवाल येण्यापूर्वीच स्वतःच्या माहेरी चिखली (ता.श्रीगोंदा) येथे आली. तिथं मळ्यामध्ये मुलगा व सुनेबरोबर राहिली. आता या महिलेचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. ठाणे महापालिकेने जिल्हा प्रशासनाला ही माहिती दिली आहे. त्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून महिलेसह तिचा मुलगा व सुनेस नगर येथे क्वारंटाईन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. या महिलेमुळं आतापर्यंत करोनामुक्त असलेल्या श्रीगोंदा तालुक्यात करोनाचा शिरकाव झाला आहे.
https://ift.tt/2XlJ6j6