'विरोधी पक्षनेत्यांनी तीर्थक्षेत्र गुजरातचा दौरा करावा, मग त्यांना कळेल' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 26, 2020

'विरोधी पक्षनेत्यांनी तीर्थक्षेत्र गुजरातचा दौरा करावा, मग त्यांना कळेल'

https://ift.tt/3gtvN9d
मुंबई: करोनाची परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करणाऱ्या भाजपवर शिवसेनेनं घणाघाती हल्ला चढवला आहे. 'पॅकेजची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी महाराष्ट्रातील करोना युद्धात अडथळे आणीत आहेत. या रिकाम्या खोक्यात रिकामी डोकी भरून त्यांना गुजरातच्या अंधारकोठड्या पाहायला पाठवायला हवे,' असा हल्लाबोल शिवसेनेनं केला आहे. (Shivsena's advice to Maharashtra Opposition Leaders) 'करोना उपाययोजनांसंदर्भात सरकारला अहमदाबाद उच्च न्यायालयाने फैलावर घेतले आहे. तेथील सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षा भयंकर असल्याचे फटकारे उच्च न्यायालयानेच मारले आहेत. याचाच आधार घेत शिवसेनेनं राज्यातील भाजपच्या नेत्यांवर तोफ डागली आहे. महाराष्ट्र सरकारने गेल्या दोन महिन्यांत जी रुग्णालये उभी केली आहेत, त्या रुग्णालयांत विरोधी पक्षनेत्यांनी पायधूळ झाडावी व एकदा तीर्थक्षेत्र गुजरातचा दौरा करून यावे, म्हणजे त्यांना आपल्या महाराष्ट्राच्या तयारीची कल्पना येईल, असं शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून सुनावलं आहे. 'उच्च न्यायालयाने गुजरातबाबत जे निष्कर्ष मांडले आहेत ते देशभरातील आरोग्य यंत्रणांचे डोळे उघडणारे आहेत. अहमदाबादमध्ये करोनावर उपचार करणाऱ्या मुख्य शासकीय रुग्णालयातच आतापर्यंत ३७७ रुग्णांचा मृत्यू झाला असून हा आकडा धक्कादायक आहे. गुजरातमधील करोना परिस्थितीची तुलना न्यायालयानं बुडणार्‍या टायटॅनिक जहाजाशीच केली आहे. सरकारी रुग्णालयाची स्थिती ‘खतरनाक’ आहे. कोणत्याही सुविधा नाहीत. मनुष्यबळ नाही. रुग्ण तेथे मरायलाच दाखल होतात, असं न्यायालय म्हणत असल्याची आठवण शिवसेनेनं करून दिली आहे. अग्रलेखातील ठळक मुद्दे: >> लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून राज्य सरकारची बदनामी करायची. त्यातून ‘ठाकरे सरकार’ कोलमडेल व आपला वनवास संपेल, असे दिवास्वप्न विरोधी पक्ष पाहात आहे. पण विरोधी पक्ष भ्रमात आहे. असे काही घडण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. >> राज्य सरकारनेही एक विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे. राज्य सरकारने वेगळे पॅकेज जाहीर करावे याचा अर्थ केंद्र सरकारने जाहीर केलेले २० लाख कोटींचे पॅकेज पोकळ आणि कुचकामी आहे. >> महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणात आरोग्य यंत्रणा उभ्या केल्या आहेत. देशातील पहिले फिल्ड हॉस्पिटल वांद्रे-कुर्ला संकुलात उभे राहिले आहे. ऑक्सिजन, आयसीयू बेडस् असलेली रुग्णालये जिल्हास्तरांवर उभी केली आहेत. काही लाख बेडस् उभे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. हे अपयश आहे असं विरोधकांना वाटत असेल तर त्यांच्या शरीरात द्वेषाचाच वायू पसरला असून त्यांना ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. >> विरोधकांनी किती बोलावे याचे रेशनिंग संकटकाळात होणे गरजेचे आहे. विरोधी पक्ष हा जनतेचा आवाज आहे असे आता सांगितले गेले. पण त्याची नियत साफ असेल तरच तो जनतेचा आवाज म्हणता येईल, नाहीतर ते नुसतेच किंचाळणे ठरते. >> गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, हरियाणासारख्या राज्यांतही करोनाचा कहर आहे. गुजरातला तर न्यायालयानेच झापले, पण तेथील राज्यपालांनी कोरोनासंदर्भात आढावा बैठका घेतल्याचे दिसत नाही. मग हे सर्व महाराष्ट्रातच का घडवले जात आहे? >> ज्या राज्यात ऑक्सिजन सिलिंडरअभावी दोनशे अर्भक तडफडून मरतात त्या राज्यात सर्व आलबेल, पण महाराष्ट्रात १५ हजारावर रुग्ण करोनावर विजय मिळवून घरी गेले ते सरकार अपयशी ठरविण्याचे हे कुटील कारस्थान असून महाराष्ट्राचा विरोधी पक्ष या कारस्थानाचा सूत्रधार ठरत आहे.