मुंबई: देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल घोषित केलेल्या आर्थिक पॅकेजवरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपलाही घेरलं आहे. '२० लाख कोटी रुपयांचं पॅकेज देणारे पीएम केअर फंडासाठी (PM Care Fund) एवढी जाहिरात का करत आहेत,' असा बोचरा सवाल मनसेनं केला आहे. मनसेचे नेते यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. लॉकडाऊनमुळं ठप्प झालेली अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी काल २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. महाराष्ट्रासह भाजपच्या देशभरातील नेत्यांनी मोदींच्या या घोषणेचं जोरदार स्वागत केलं आहे. मनसेचे देशपांडे यांनी भाजपला पीएम केअर फंडासाठी भाजप नेत्यांकडून केल्या गेलेल्या आवाहनांची आठवण करून दिली आहे. करोनाच्या संकटाशी लढण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी नव्यानं 'पीएम केअर फंड' अर्थात, मदतनिधी सुरू केला आहे. जनतेनं यात योगदान द्यावे, असं आवाहन भाजपकडून सातत्यानं करण्यात येत आहे. राज्यातील भाजप नेत्यांनी तर आपल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना सीएम केअर फंडाऐवजी पीएम केअर फंडात मदत करण्याचं आवाहन केलं होतं. त्यावरून भाजपवर टीकेची झोड उठली होती. मनसेनं आता नेमकं यावरच बोट ठेवलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनंही पंतप्रधान मोदींच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे. संकटाचं संधीत रूपांतर करण्याचं आवाहन मोदींनी केलं होतं. 'थाळी वाजवा, दिवे जाळा' असा मोदींच्या या आवाहनाचा अर्थ आहे, असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही मोदींच्या भाषणातील काही शब्द ट्विट करून 'पैचान कौन?' असा प्रश्न विचारला आहे.