औरंगाबाद: शहरातील गारखेडा परिसरातील गुरुदत्त नगर येथील ४७ वर्षीय करोनाबाधित वाहनचालकाचा आज पहाटे साडेसहाच्या सुमारास उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे मृत्यू झाला. त्याला २७ एप्रिल रोजी उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले होते. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृतांची संख्या ८वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १७७ झाली असून, आतापर्यंत २३ करोनाबाधित करोनामुक्त होऊन उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या घाटीच्या डेडिकेटेड कोविड वॉर्डात ११ कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. व्यवसायाने वाहन चालक असलेल्या गुरुदत्तनगर येथील या रूग्णास सात दिवसांपासून ताप, कोरडा खोकला आणि चार दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याला लक्षणांवरून करोनाचा संशयित रुग्ण म्हणून घाटीमध्ये दाखल करण्यात आले होते. तसेच त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातून घाटीमध्ये रेफर करण्यात आले होते व जिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेल्या स्वॅब चाचणीत तो निगेटीव्ह असल्याचे देखील समोर आले होते. मात्र घाटीमध्ये घेण्यात आलेल्या चाचणीत तो करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्याला कोव्हिड कक्षात हलविण्यात आले. तिथे त्याला कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. न्यूमोनिआ, श्वसन विकार असल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असेही घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळविले आहे. दरम्यान, राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १० हजार ४९८ झाली आहे. काल १८० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १७७३ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ८२६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.