मुंबई: 'राज्यात अस्थिरता नको व विरोधी पक्षही अस्थिर नको, असं शिवसेनेला वाटतं. पण सध्या खडसे, पंकजा, बावनकुळे, तावडे अशा मंडळींचीही अस्वस्थ तगमग, तळमळ सुरू आहे. त्या तगमगीतून एखाद्या नव्या भूकंपाची वात पेटू नये म्हणून विरोधी पक्षाने सावध राहायला हवे,' असा इशारा शिवसेनेनं भाजपला दिला आहे. () यांच्यासह नऊ सदस्यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. त्याच अनुषंगानं शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून ( Mouthpiece Editorial) शिवसेनेनं भाजपवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. 'विरोधकांनी अनेक अडथळे निर्माण करूनही उद्धव ठाकरे हे बिनविरोध निवडून गेले आहेत. सरकार अडचणीत आणण्यासाठी राजकीय दाबदबावाचे जंतरमंतर करू पाहणारेच परागंदा झाले आहेत. विरोधकांचे सगळे अघोरी प्रयोग त्यांच्यावरच उलटले आहेत, असं म्हणत, 'मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है, जो मंजुर-ए-खुदा होता है… असा चिमटा शिवसेनेनं काढला आहे. नाराज खडसे हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची सध्या चर्चा आहे. त्याबाबत विचारलं असता करोनानंतर काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप होईल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी केला होता. त्यांचाही शिवसेनेनं समाचार घेतला आहे. 'चंद्रकांतदादा अशी काही उलथापालथ घडवू पाहत असतील तर तो त्यांचा राजकीय हक्क आहे. पण आता करोनाचे संकट आहे. ते गेल्यावर त्यांनी सरकार पाडण्यासाठी करवत, हातोडे, विळे, कोयते वगैरे घेऊन कामास लागावे. मात्र, विरोधक ठाकरे सरकार खिळखिळे करण्याचा जेवढा प्रयत्न करतील तेवढे हे सरकार मजबूत आणि गतिमान होईल. महाविकास आघाडीचे सरकार स्वत:च्या पायावर मजबुतीने आत्मनिर्भर झाले आहे. त्याच आत्मनिर्भरतेचा मार्ग विरोधी पक्षाने स्वीकारावा,' असा सल्ला देण्यात आला आहे. 'चंद्रकांत पाटील काय किंवा देवेंद्र फडणवीस काय, हे आपापल्या पक्षांचे झेंडे आणि भूमिका घेऊन पुढे निघाले आहेत. १०५ चा भक्कम आकडा असतानाही त्यांना सत्ता राखता आली नाही. त्यांच्या जागी दुसरे कोणी असते तर त्यांच्याही मनाची अशीच तळमळ व शरीराची लाहीलाही झाली असती,' अशी खोचक टीका शिवसेनेनं केली आहे.