ठाणे: पालघर येथे जमावाच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या साधूंची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या वकिलाचा अपघाती मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोरजवळ बुधवारी सकाळी कार उलटून हा अपघात झाला. त्यात वकिलाचा जागीच मृत्यू झाला. हा केवळ अपघात असून त्यामागे प्रथमदर्शनी संशयास्पद काहीही नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. असं अपघातात मृत्यू झालेल्या वकिलाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिवेदी हे डहाणू कोर्टात चालले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या सहकारी प्रीती त्रिवेदी या देखील होत्या. मनोर येथील मेंडवान पुलाजवळ असताना त्रिवेदी यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार उलटली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रीती गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर कासा येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं. कासा पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. त्रिवेदी हे मीरा-भाईंदरमध्ये वास्तव्यास होते. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या लीगल सेलचे काम ते पाहत होते. विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकारानं त्यांनी पालघरमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणाचं वकीलपत्र घेतलं होतं. मागील महिन्याच्या १६ तारखेला पालघरमधील गडचिंचोले गावात महंत कल्पवृक्षगिरी महाराज, सुशीलगिरी महाराज या दोन साधूंसह त्यांचा कार चालक नीलेश तेलगडे याची जमावानं लाठ्याकाठ्या आणि दगडानं ठेचून हत्या केली होती. या प्रकरणामुळं देशभरात राजकीय वादळ उठलं होतं. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका झाली होती. तसंच, विश्व हिंदू परिषदेनं सीआयडी चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारनं या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडं सोपवला होता. या प्रकरणी आतापर्यंत २४ जणांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.