संघ परिवारासमोर हे मोठे आव्हान; शिवसेनेने केले सावध - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 15, 2020

संघ परिवारासमोर हे मोठे आव्हान; शिवसेनेने केले सावध

https://ift.tt/3d47wTW
मुंबई: 'नेपाळबरोबर आपला सीमावाद पूर्वीपासून होता, पण तो कधी टोकाला गेला नव्हता. नेपाळ कधी भारतावर गुरगुरण्याच्या भानगडीत पडला नव्हता. मात्र आता डरकाळ्या फोडत आहे. नेपाळच्या अंगात हे हत्तीचे बळ आले कोठून?,' असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे. 'नेपाळचे राज्यकर्ते हे चीनचे मांडलिक झाले असले तरी तेथील जनता भारताबरोबर एक आस्था ठेवून आहे. या जनतेला आत्मनिर्भर करून आत्मबळ देण्याची गरज आहे. संघ परिवारासमोर हे मोठं आव्हान आहे,' असंही शिवसेनेनं म्हटलंय. (Shivsena on ) भारताचा भाग असलेले कालापानी, लिम्पियाधुरा आणि लिपुलेख हे प्रदेश आमचे आहेत, असं नेपाळचं म्हणणं आहे. या भागांसह एक नवा नकाशा नेपाळनं अलीकडंच प्रसिद्ध केला होता. भारतानं नाराजी दर्शवल्यानंतरही नेपाळनं आपली भूमिका कायम ठेवली. इतकंच नव्हे तर नेपाळच्या नव्या नकाशाला तेथील संसदेत एकमतानं मंजुरी देण्यात आली. त्यानंतर अलीकडंच नेपाळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सीमेवर एक भारतीय नागरिक ठार झाला व दोघे जखमी झाले. त्यामुळं मोठाच राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून या संपूर्ण घडामोडींवर चिंता व्यक्त केली आहे. 'नेपाळनं इतक सगळं करूनही आपले पंतप्रधान, संरक्षणमंत्री नेपाळसंदर्भात काही बोलायला तयार नाहीत व नेपाळबरोबरचे संबंध उत्तम असल्याचे आपले लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे सांगत आहेत, हे आश्चर्यकारक असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. 'नेपाळ व भारताचे धार्मिक तसेच ऐतिहासिक संबंध आहेत, पण हे संबंध मानणारी पिढी नेपाळमध्ये शिल्लक नाही व चीन हाच त्यांना आपला मायबाप वाटतो. प्रभू श्रीरामांची सासुरवाडी व सीतामाईचे माहेर नेपाळ, असे हे धार्मिक नाते आहे. मात्र याच नेपाळातून चिन्यांनी हिंदुत्ववाद खतम केला आहे. त्यामुळे भविष्यात नेपाळ ही सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरेल, अशी भीती शिवसेनेनं व्यक्त केली आहे. संघ परिवारासमोर आव्हान नेपाळच्या राजकीय भूमिकेबद्दल चिंता व्यक्त करतानाच तेथील जनतेबाबत मात्र शिवसेनेनं आशा व्यक्त केली आहे. 'नेपाळचे विद्यमान राज्यकर्ते हे चीनचे मांडलिक बनत असले आणि त्यातून नेपाळच्या अंगात आले असले तरी नेपाळची जनता भारताबरोबर एक आस्था ठेवून आहे. चीनने भगव्या नेपाळचा रंग लाल केला हे त्यांना मान्य नाही. एक दिवस नेपाळची जनताच बंड करून काठमांडूवर पुन्हा हिंदुत्वाचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. त्या नेपाळी जनतेला आत्मविश्वास देणे गरजेचे आहे. नेपाळच्या जनतेला आत्मनिर्भर करून आत्मबळ देण्याची गरज आहे. संघ परिवारासमोर हे मोठे आव्हान आहे! संघ परिवार नेपाळवर काय भूमिका घेतो ते पाहायचे,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे.