मनमाड: नाशिकमधील परिसर हत्याकांडानं हादरलं. वाखारी जेऊर येथे एकाच कुटुंबातील २ चिमुकल्यांसह चौघांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. चौघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. आज, शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. त्यामुळं परिसरात खळबळ माजली आहे. समाधान आण्णा चव्हाण (वय ३७), भरताबाई चव्हाण (वय ३२), मुलगा गणेश (वय ६), मुलगी आरोही (वय ४) अशी हत्या झालेल्यांची नावं आहेत. समाधान हे कुटुंबासह मळ्यातील घराच्या ओसरीत झोपलेले होते. आज सकाळी त्यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले. चौघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. रात्री झोपेतच गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, तपास करण्यात येत आहे. समाधान हे रिक्षाचालक आहेत. तर त्यांची पत्नी भरताबाई या मोलमजुरी करत होत्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे समाधानही घरीच असतात. हे चौघेही मळ्यातील घरात राहत होते. शुक्रवारी सकाळी त्यांचे मृतदेह आढळले. गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.