
हाथरस: उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये मानवी तस्करीविरोधी युनिटने करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दिल्लीतील तस्करांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून पलायन केलेली एक १७ वर्षीय मुलगी हाथरसच्या बस थांब्यावर शनिवारी रात्री उशिरा सापडली. तेथील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात नेले. तिच्याकडे चौकशी केली असता, तिने धक्कादायक माहिती दिली. तीन दिवस पायी चालून २०० किलोमीटर अंतर कापून हाथरसला पोहोचल्याचे तिने सांगितले. एका व्यक्तीने मध्य प्रदेशातील १२ मुलींना काम देण्याच्या बहाण्याने दिल्लीला नेले होते. एका कोणत्या तरी शहरात खोलीत अनेक दिवसांपासून उपाशीपोटी डांबून ठेवले. मात्र, संधी मिळताच मुली तेथून पळाल्या, अशी माहिती या मुलीने दिली. हाथरसचे पोलीस अधीक्षक विनीत जयसवाल यांनी सांगितले की, शनिवारी रात्री उशिरा कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली की बस थांब्यावर एक १७ वर्षीय मुलगी सापडली आहे. मध्य प्रदेशातील मंडलामधील तोगल गावातील ती राहणारी असल्याची माहिती मिळाली. आठवडाभरापूर्वी कुटुंबीयांच्या सहमतीने गावातील १२ मुलींना एक व्यक्ती दिल्लीला घेऊन जात होता. त्यांना शिवणकाम देणार असल्याचे त्याने सांगितले होते. उपाशीपोटी डांबून ठेवले पोलिसांच्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने मुलींना एका खोलीत अनेक दिवस डांबून ठेवले होते. मुलींना त्या व्यक्तीवर संशय आला. त्या सर्व जणांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी मुलींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. तसेच आरोपी व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. ज्या ठिकाणी डांबून ठेवले होते, ते नेमके ठिकाण मुली सांगू शकत नाहीत. १२ मुलींनी स्वतःची सुटका करून घेतली असे मुलीने सांगितले आहे. हे प्रकरण गंभीर आहे. ही मुलगी गेल्या तीन दिवसांपासून चालत होती. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. दरम्यान मुलीला चाइल्ड हेल्पलाइन टीमकडे सोपवले आहे.