
औरंगाबाद: जिल्ह्यातील तालुक्यात एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात एका ८ वर्षीय मुलीचा समावेश आहे. तर ६ वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला असून, जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पैठण तालुक्यातील जुने कावसन गावात ही घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास हे घडले. अज्ञात हल्लेखोराने घरात घुसून संभाजी निवारे यांच्या कुटुंबावर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात संभाजी निवारे, त्यांची पत्नी अश्विनी निवारे, ८ वर्षांची मुलगी सायली निवारे यांचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यातून त्यांचा सहा वर्षांचा मुलगा सोहम थोडक्यात बचावला आहे. तो जखमी झाला आहे. त्याला तातडीने औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संभाजी निवारे यांच्या घरातच हे हत्याकांड घडले. संभाजी निवारे यांच्या जवळच्या नात्यात लग्न होते. शुक्रवारी ते शहरात जाऊन खरेदी करून आले होते. उशिरा रात्री जेवण करून सर्व जण झोपी गेले होते. त्यानंतर आज पहाटे शेजाऱ्याला घराचे दार खुले असल्याचे दिसले. त्याने घरात डोकावून बघितले असता, तिघांचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.