
नवी दिल्लीः देशात करोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. देशात आज पुन्हा करोनाचे ५० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने आज गेल्या २४ तासांतील करोना रुग्णांसंबंधीची आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या २४ तासांत करोनाचे ५३,४८० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यानुसार देशात करोनाचा एकूण संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्याही १२,१४९,३३५ इतकी झाली आहे. यातून ११,४३४,३०१ इतके जण करोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या ५,५२,५६६ इतके करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जे एकूण संख्येच्या ४.५५ टक्के आहेत. करोनाने देशात गेल्या २४ तासांत ३५४ जणांचा मृत्यू झाला आहे. यानुसार देशातील मृतांची संख्या १,६२,४६८ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात करोनाच्या सर्वाधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात २७९१८, छत्तीसगडमध्ये ३१०८, कर्नाटकमध्ये २९७५, केरळमध्ये २३८९ आणि तामिळनाडूमध्ये २३४२ इतके नवीन रुग्ण आढळून आले आहेत. करोनाने झालेल्या मृतांची संख्या पाहता गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात १३९, पंजाबमध्ये ६४, छत्तीसगडमध्ये ३५, कर्नाटकमध्ये २१ आणि तामिळनाडूमध्ये १६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशातील काही राज्यांत करोनाचा वाढता संसर्ग हा धोकादायक आहे. यामुळे देशालाही धोका निर्माण झाला आहे. परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. यामुळे प्रशासन आणि नागरिकांनी कुठलाही निष्काळपणा न दाखवता काळजी घेण्याची गरजा आहे, असं केंद्र सरकारने मंगळवारी सांगितलं. देशातील करोनाचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या १० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, नागपूर आणि अहमदनगरचा यात समावेश आहे. तर दिल्ली आणि बेंगळुरू शहरही यात आहे. देशात करोनाचे रुग्ण गेल्या वर्षी ७ ऑगस्टला २० लाखांवर गेले होते. यानंतर संसर्ग वाढत जाऊन २३ ऑगस्टला ३० लाख, ५ सप्टेंबरला ४० लाख आणि १६ सप्टेंबरला ५० लाखांवर गेले होते. यात अशीच वाढ होऊन ही रुग्ण संख्या १ कोटीवर गेली. १९ डिसेंबरला देशातील करोनाचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णंची संख्या ही १ कोटींवर गेली होती.