
ठाणे: ठाण्यातील वारीमाता गोल्ड या ज्वेलर्स दुकानातून जानेवारीमध्ये तब्बल १ कोटी ३७ लाखांचे सोने, चांदीचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणात पटना येथून विमानाने मुंबईत आलेल्या तीन आरोपींना कासारवडवली पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन ताब्यात घेतले आहे. मुळचे झारखंडचे असलेल्या आरोपींचा या गुन्ह्यामध्ये सक्रिय सहभाग आहे. शिवाय आरोपींचा पुण्यातही ज्वेलर्स दुकान फोडून चोरी करण्याचा डाव होता. त्यासाठी ते आले होते. मात्र वेळीच पकडले गेल्याने पुढील अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यात जानेवारीत वारीमाता गोल्ड पडला होता. या दरोड्यात चोरट्यांनी १ कोटी ३७ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरले होते. या दरोड्याच्या घटनेचा तपास सुरू होता. पोलिसांनी पाटणा येथून विमानाने मुंबईत आलेल्या तिघांना विमानतळावरून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, या दरोड्यात त्यांचा सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुलतान आबुल शेख, अब्दुल भादू शेख हक, आलमगीर जब्बार शेख अशी या आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण मूळचे झारखंडचे आहेत. महत्वाचे म्हणजे आरोपी पुण्यात ज्वेलर्समध्ये चोरी करण्यासाठी विमानाने आले होते, अशी माहिती चौकशीत उघड झाली आहे. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी सर्व पोलिस ठाण्याना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कासारवडवली पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी आरोपींच्या मागावर होते. दरम्यान वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर खैरनार यांना सुलतान आबुल शेख, अब्दुल भादू शेख हक, आलमगीर जब्बार शेख हे तीन आरोपी पटना येथून विमानाने मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाली. तात्काळ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या पथकाने या तिन्ही आरोपींना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. सर्व आरोपी मुळचे झारखंडचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वारीमाता गोल्ड ज्वेलर्स दुकानातून तब्बल १ कोटी ३७ लाखांचे सोने, चांदीचे दागिने चोरीला गेल्याच्या प्रकरणात या तिघाही आरोपींचा सक्रिय सहभाग असल्याची बाब समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे आरोपी पुण्यात ज्वेलर्स दुकानात चोरी करण्यासाठी विमानाने आले होते, ही बाबही चौकशीत समोर आली आहे. भिंतीला भगदाड पाडून केली होती लूट ठाण्यातील शिवाईनगर परिसरात असलेल्या वारीमाता ज्वेलर्सचे दुकान चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास फोडले होते. दरोडेखोरांनी दुकानातून ३ किलो सोने आणि चांदी लूटून नेली होती. ज्वेलर्स दुकानाच्या बाजूच्या गाळ्यात चोरट्यांनी फळविक्रीचा व्यवसाय सुरू करून रात्रीच या ज्वेलर्सच्या भिंतीला भगदाड पाडून ही लूट केली होती. वर्तकनगर पोलीस ठाण्यात १७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुकानाच्या बाजूचा गाळा एका फळविक्रेत्याने दोन महिन्यांपूर्वी २८ हजार रुपयांच्या मासिक भाड्यावर घेतला होता. परराज्यातील एका व्यक्तीला दुकान मालकाने फारशी चौकशी न करता केवळ अधिक भाडे मिळत असल्याने हे दुकान भाड्याने दिले होते. गेल्या दोन महिन्यांपासून फळविक्रीचा व्यवसाय केवळ नावापुरता केला जात होता. पहाटेच्या सुमारास फळविक्रेत्याने दुकान आणि ज्वेलर्समधील भिंत फोडून ज्वेलर्समध्ये प्रवेश केला. दुकानातील तिजोरी गॅस कटरने कापून त्यातून ३ किलो सोने घेऊन फरार झाले. पूर्वनियोजित हा दरोडा टाकण्यात आला होता.