करोनाची झळ ; 'लॉकडाउन'मध्ये तब्बल १० हजार कंपन्यांना लागले कायमचे टाळे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, March 9, 2021

करोनाची झळ ; 'लॉकडाउन'मध्ये तब्बल १० हजार कंपन्यांना लागले कायमचे टाळे

https://ift.tt/3rwxRlF
नवी दिल्ली : करोना संकटात हजारो कंपन्यांना कायमचाच गाशा गुंडाळावा लागल्याची माहिती केंद्र सरकारने जाहीर केली आहे. करोना रोखण्यासाठी लागू केलेल्या कठोर टाळेबंदीनं औद्योगिक क्षेत्राचे मोठे नुकसान केलं होतं. अनेक छोट्या-मोठया उद्योगांची या काळात प्रचंड वाताहत झाली. एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात एकूण १०११३ कंपन्यांना कायमचे टाळे लागल्याची माहिती कंपनी व्यवहार खात्याच्या ताज्या आकडेवारीवरून समोर आली आहे. यातून हजारो कामगार देशोधडीला लागले. कंपनी कायदा २०१३ च्या कलम २४८(२) नुसार देशातील १०११३ कंपन्यांनी स्वेच्छेने व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनी व्यवहार राज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत सांगितले. या कंपन्यांविरोधात कंपनी व्यवहार मंत्रालयाकडून कोणतीही कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. बंद झालेल्या सर्वाधिक कंपन्या या दिल्लीमधील आहेत. मागील ११ महिन्यात दिल्लीतील सर्वाधिक २३९४ कंपन्या बंद झाल्या आहेत. त्याखालोखाल उत्तर प्रदेशमधील १९३६ कंपन्या टाळे लागले. तामिळनाडूमध्ये याच काळात १३२२ कंपन्यांनी आपले शटर डाउन केले. तर महाराष्ट्रात १२७९ कंपन्यांना टाळे लागले. जवळपास सर्वच प्रमुख राज्यांमध्ये काळात कंपन्याना टाळी लागल्याचे दिसून आले आहे. कर्नाटकात ८३६ कंपन्या बंद झाल्या आहेत. तर चंदीगडमध्ये ५०१ कंपन्या, राजस्थानमध्ये ४७९ कंपन्या, तेलंगणामध्ये ४०४ कंपन्या, केरळमध्ये ३०७ कंपन्या, झारखंडमध्ये १३७ कंपन्या बंद झाल्या आहेत. तर मध्य प्रदेशात १११ कंपन्यांनी आणि बिहारमध्ये १०४ आहे. याच काळात ओदिशामध्ये ७८ कंपन्या, छत्तीसगढमध्ये ४७ , गोवा ३६, पुद्दुचेरीमध्ये ३१ कंपन्या बंद झाल्या. गुजरातमध्ये १७ कंपन्या बंद झाल्या आहेत तर पश्चिम बंगालमध्ये मागील ११ महिन्यात केवळ ४ कंपन्या बंद झाल्या असल्याची माहिती अनुराग ठाकूर यांनी संसदेसमोर मांडली.