अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं : तिहार तुरुंगातील कैद्याकडून मोबाईल जप्त - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 12, 2021

अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं : तिहार तुरुंगातील कैद्याकडून मोबाईल जप्त

https://ift.tt/3eJ6HVp
नवी दिल्ली : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि व्यावसायिक यांच्या घरासमोर गाडीत आढळलेल्या स्फोटकांनंतर आणि 'जैश उल हिंद'च्या धमकीनंतर या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या एका स्पेशल सेलनं गुरुवारी तिहार तुरुंगात छापे टाकलेत. धमकी देणारा 'जैश उल हिंद'च्या टेलिग्राम चॅनलची लिंक पोलिसांना तिहार तुरुंगात आढळली होती. इंडियन मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याच्या बरॅकमधून मोबाईल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांकडून दिली जातेय. यामुळे तिहार तुरुंगातील सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अत्यंत उच्च दर्जाची सुरक्षा असतानाही तुरुंगात बंद असलेल्या एका कैद्यापर्यंत मोबाईल कसा पोहचला? असा प्रश्नही यानिमित्तानं उपस्थित होत आहे. तिहार तुरुंगात गुरुवारी सायंकाळी ६.०० वाजल्यापासून रात्री ९.०० वाजेपर्यंत दिल्ली स्पेशल सेलनं तुरुंग क्रमांक ८ मध्ये छापे टाकले. त्यानंतर इंडियन मुजाहिद्दीचा दहशतवादी याच्या बरॅकमधून करण्यात आला. याच मोबाईलवरून टेलीग्राम चॅनल अॅक्टिवेट करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. उल्लेखनीय म्हणजे, पाटणाच्या गांधी मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीत बॉम्बस्फोट, हैदराबादमध्ये स्फोट आणि बोधगया बॉम्बस्फोट प्रकरणी तहसीन अख्तर याला अटक करण्यात आली होती. तहसीन अख्तरच्या बरॅकमधून जो मोबाईल हस्तगत करण्यात आला त्या मोबाईलमध्ये 'टोर ब्राउजर'द्वारे व्हर्च्युअल क्रमांक तयार करण्यात आला. त्यानंतर टेलिग्राम अकाउंट तयार करून त्याद्वारे धमकीचे मॅसेज तयार करण्यात आले. तहसीन अख्तरची तुरुंगाकडून रिमांड घेऊन स्पेशल सेलकडून त्याची चौकशी केली जाणार आहे. यासोबतच आणखी एक क्रमांकही स्पेशल सेलच्या रडारवर आहे. हा क्रमांक सप्टेंबर महिन्यात अॅक्टिव्ह झाला होता त्यानंतर तो बंद करण्यात आला. दोन मोबाईल नंबर खोट्या कागदपत्रांसहीत तिहारमध्ये बंद असलेल्या काही लोकांसाठी खरेदी करण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. महाराष्ट्र सरकारकडूनही तपास सुरू दुसरीकडे, या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र सरकारकडून एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. परंतु, महाराष्ट्र सरकारला विश्वासात न घेता हा तपास एनआयएकडे देण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशांवर राज्य सरकारकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. 'हा तपास एटीएसकडे देण्यामागे नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे, असा गंभीर आरोप खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता.