अंत्यसंस्कार करणाऱ्या हातांपुढे नागरिक नतमस्तक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 29, 2021

अंत्यसंस्कार करणाऱ्या हातांपुढे नागरिक नतमस्तक

https://ift.tt/2R6wpt9
अहमदनगर: करोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना इकडे हॉस्पिटलमध्ये बेडपासून ऑक्सिजनपर्यंत धावाधाव सुरू आहे. तिकडे लस आणि औषधांवरून राजकारण सुरू आहे. अशा परिस्थितीत काही हात आले काम चोखपणे, विनातक्रार आणि कोणतेही राजकारण न करता बजावत आहेत. ते म्हणजे स्मशानभूमीत मृतांवर अंत्यसंस्कार करणारे स्वयंसेवक. नगरमध्ये अशाच स्वयंसेवकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. जागरुक नागरिक मंचाच्या सदस्यांनी नगरकरांतर्फे थेट अमरधाममध्ये जाऊन या स्वयंसेवकांना हात जोडून वंदन केले. वाचा: करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्मशानभूमीही सतत धगधगत आहे. तेथे राबणारे कर्मचारी आणि स्वयंसेवक अविऱश्रांतपणे काम करीत आहेत. कित्येक दिवस ते घरीही गेले नाहीत. करोनाचे नियम पाळून अंत्यविधी करताना माणुसकीचा ओलावाही त्यांना टिकवावा लागत आहेत. कधी मृतासोबत नातेवाईक येतात, तर कधी कोणीच नसते. परिस्थितीत कशीही असली तरी स्वत:च्या जीव धोक्यात घालून हे स्वयंसेवक राबत आहेत. करोनायोद्धा म्हणून काही घटकांचा सन्मान होत असला तरी अंत्यसंस्कारांचे तेवढेच महत्वपूर्ण काम करणारे हे घटक उपेक्षितच राहत आहेत. त्यामुळेच येथील जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांच्या पुढाकारातून या राबणाऱ्या हातांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. वाचा: अमरधाम येथे जाऊन तेथे अंत्यसंस्काराचे काम करणारे स्वप्नील कुऱ्हे व त्यांच्या सहकाऱ्यांना पुष्पगुच्छ आणि थोडा श्रमपरिहार म्हणून लस्सीची पाकिटे देण्यात आली. यासंबंधी मुळे यांनी सांगितले की, ‘सीमेवर देशासाठी लढणारे सैनिक आणि यांच्यामध्ये खरे म्हणजे काहीही फरक नाही. सामान्य माणूस एक मृतदेह आणि त्याचे अंत्यसंस्कार पण कणखर हृदयाने पाहू शकत नाही अशा वेळी पहाटे तीन वाजेपर्यंत दररोज ५० ते ६० मृतदेहांवर अव्याहतपणे निश्चल राहून अंत्यसंस्कार करणे यासारखे दुसरी तपश्चर्या नाही. सध्या रक्ताच्या नात्याचा माणूस दूर उभा राहतो. पण घरदार कुटुंब विसरून ही मंडळी जे काम करत आहेत त्याना आम्ही कृतज्ञतेने मुजरा करून आलो. साश्रू नयनांनी पाठीवर आपुलकीची थाप देऊन आलो. या खऱ्याखुऱ्या कोविड योध्द्यांसाठी ५ लाखांच्या विम्याची आर्थिक तरतुदीची व्यवस्था सर्वांच्या मदतीने केली आहे.’ या वेळी दिनदयाळ परिवारचे वसंत लोढा, कैलास दळवी, मकरंद घोडके, राजेंद्र पडोळे, योगेश गणगले, राजेश सटाणकर, देवीप्रसाद अय्यंगार, प्रसाद कुकडे, अमेय मुळे, विशाल गायकवाड उपस्थित होते. वाचा: