
नवी दिल्ली : भारताची आयएनएस विक्रमादित्यला शनिवारी सकाळी एका दुर्घटनेचा सामना करावा लागला. कर्नाटकातील कारवार बंदरात उभी असताना आज सकाळी या युद्धनौकेत अचानक आग लागली. काही वेळातच या आगीवर ताबा मिळवण्यात आला. नौसेनेच्या एका प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, युद्धनौकेवरचे सर्व अधिकारी-कर्मचारी सुरक्षित आहेत. युद्धनौकेत आग कशी लागली? हे जाणून घेण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय नौसेनेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग लहान होती. मात्र अशा भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. शनिवारी आयएनएस विक्रमादित्यवर आग लागल्याचं समोर आलं. युद्धनौकेच्या एका भागातून धूर निघत असल्याचं ड्युटीवर तैनात स्टाफच्या ध्यानात येताच त्यांनी तातडीनं हालचाली सुरू केल्या आणि काही वेळातच कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीत कोणतंही मोठं नुकसान झालेलं नाही तसंच युद्धनौकेवर तैनात सर्व जवान सुरक्षित आहेत, अशी माहितीही नौसेनेकडून देण्यात आलीय.