नवी दिल्लीः काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार ( rajiv satav ) यांचे आज पहाटे पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. तरुण नेता गमावल्याने काँग्रेस नेतृत्वालाही धक्का बसला आहे. पंतप्रधान मोदींनीही ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे. तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार आणि पक्षाचे नेते यांनी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी माझा मित्र गमवला आहे, असं राहुल गांधी म्हणाले. राजीव सातव हे तरुण नेते होते. पुढे जाऊन मोठी जबाबदारी सांभाळण्याची त्यांची क्षमता होती. त्यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांबद्दल संवेदना व्यक्त करतो, असं पंतप्रधान मोदींनी ट्वीट मध्ये म्हटलं आहे.
राहुल गांधी म्हणाले... मी मित्राला गमवलं आहे. खूप दुःखी झालो आहे. राजीव सातव हे अतिशय हुशार, उमदे आणि उच्च क्षमता असलेले नेते होते. त्यांच्या निधनाने काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे. सातव यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. सातव हे राहुल गांधीचे अतिशय निकटवर्तीय होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंकडूनही शोक व्यक्त राजीव सातव हे राज्यसभेचे उत्तम सदस्य होते. लोकसेवेसाठी ते कटिबद्ध होते. त्यांच्या निधनाने दुःख आहे, असं ट्वीट व्यंकय्या नायडूंनी केले आहे. 