परमबीरसिंह रजेमुळे चर्चेत; 'आजारपणा'मुळे ५ मेपासून गैरहजर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 29, 2021

परमबीरसिंह रजेमुळे चर्चेत; 'आजारपणा'मुळे ५ मेपासून गैरहजर

https://ift.tt/3A2O5YB
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या खंडणीवसुलीचा आरोप केल्यामुळे चर्चेत आलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि राज्य गृहरक्षक दलाचे दीर्घकालीन रजेवर गेले आहेत. पाच मेपासून गैरहजर असलेल्या परमबीर यांनी आजारपणामुळे रजा घेतल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्यांनी एवढी दीर्घ रजा घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. एका बाजूला अनिल देशमुख प्रकरणाची न्यायालयात सुनावणी आणि दुसऱ्या बाजूला एनआयएने पुन्हा सुरू केलेले अटकसत्र यामुळे ते दीर्घ रजेवर गेल्याचे म्हटले जात आहे. उद्योगपती यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटके मिळणे आणि त्यानंतर ज्या कारमध्ये स्फोटके सापडली त्या कारचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही प्रकरणांत मुंबई पोलिस दलातील अधिकाऱ्यांचा सहभाग उघड झाल्यानंतर परमबीर सिंह यांना मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून हटविण्यात आले होते. यानंतर परमबीर यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीवसुलीचा आरोप केला होता. यामुळे देशमुख यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटवून गृहरक्षक दलाची जबाबदारी दिल्यामुळे नाराज झालेले परमबीर त्यानंतर काही दिवस सुट्टीवर गेले होते. आत्ता पुन्हा एकदा ते रजेवर गेले आहेत. त्यामुळे गृहरक्षक दलाची अतिरिक्त जबाबदारी आयपीएस अधिकारी के. व्यंकटेशन यांच्यावर सोपविण्यात आली आहे. परमबीर सध्या चंडीगडमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, तेथील डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र त्यांनी सादर केल्याचे सांगितले जाते. अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएच्या तपासाला पुन्हा वेग आला आहे. त्यातच परमबीर यांच्यावर खंडणीचे अनेक आरोप असून, त्याचा तपासही वेगवेगळ्या यंत्रणांना देण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आलेल्या प्रकरणाचा गोपनीय तपासही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे परमबीर नेमके कोणत्या कारणांमुळे रजेवर आहेत याची चर्चा सध्या रंगली आहे.