
मुंबई : २०२१-२२ मधील V मालिका आज सोमवार ९ ऑगस्ट २०२१ पासून खुली झाली आहे. यासाठी सरकारने प्रती ग्रॅम ४७९० रुपये भाव निश्चित केला आहे. याआधी जुलै महिन्यातील गोल्ड बॉण्डच्या तुलनेत १७ रुपयांनी कमी आहे. सार्वभौम सुवर्ण रोखे योजना ९ ते १३ ऑगस्ट २०२१ या कालावधीत खुली राहणार आहे. 'आरबीआय'ने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात रोखे खरेदी कालावधीत रोख्यांची इश्यू किंमत ४७९० रुपये प्रती ग्रॅम असेल. रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार केंद्र सरकारने ऑनलाईन अर्ज आणि देय रक्कम डिजिटल मोडद्वारे भरणाऱ्या गुंतवणूकदारांना इश्यू प्राईसच्या प्रती ग्राम ५० रुपये सवलत जाहीर केली आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण रोख्यांचे मूल्य ४७४० रुपये प्रती ग्रॅम असेल, असे सरकारने म्हटलं आहे. दरम्यान, कमॉडिटी बाजारात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीमध्ये मोठी घसरण झाली आहे. आज सोमवारी कमाॅडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ६५० रुपयांनी कमी झाला असून तो ४६ हजारांखाली आला आहे. चांदीमध्ये देखील १३०० रुपयांची घसरण झाली आहे. एक किलो ६३९४० रुपये झाला आहे. गोल्ड बॉंड्स योजनेविषयी - एक ग्रॅम आणि त्यापटीत गोल्ड बाँड उपलब्ध आहेत. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात सरकार सहा टप्प्यांमध्ये गोल्ड बाँडची विक्री केली जाणार आहे. त्यातील शेवटचा टप्पा सोमवार पासून सुरु होणार आहे. - गुंतवणूकदारांना टपाल कार्यालये, बॅंका, स्टॉक होल्डींग कॉर्पोरेशनमधून गोल्ड बॉंड खरेदी करता येतील. त्याचबरोबर मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारातून गोल्ड बॉंडची विक्री केली जाणार आहे. कर्जासाठी तारण म्हणून गोल्ड बॉंडला मान्यता आहे. - वैयक्तिक गुंतवणूकदारांना १ ग्रॅमपासून त्यापटीत जास्तीत जास्त ४ किलो, एचयूएफ ४ किलोग्रॅम आणि ट्रस्ट आणि इतर संस्थांना २० किलोपर्यंत गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करता येईल. - यावर दरवर्षी २.५० टक्के व्याज दिले जाणार आहे. वार्षिक आणि अर्ध वार्षिक स्तरावर व्याज दिले जाईत. या बॉंडची मुदत आठ वर्षांची असून, पाच वर्षांनंतर यातून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तब्बल ३२.३५ टन सोने विक्री सार्वभौम सुवर्ण रोखे योजना सुरु झाल्यापासून जुलैपर्यंत या योजनेत केंद्र सरकारने २५७०२ कोटी उभारले आहेत. नोव्हेंबर २०१५ मध्ये केंद्र सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे योजना सुरु केली होती. रिझर्व्ह बँकेने २०२०-२१ या वर्षात गोल्ड बॉन्ड योजनेचे विक्री १६ टप्पे जारी केले. ज्यातून तब्बल ३२.३५ टन सोने विक्री झाले आहे. ज्यात सरकारला १६०४९ कोटींचा महसूल मिळाला होता.