आधीच्या सरकारनी राजकीय जोखीम उचलली नाही: PM मोदी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 12, 2021

आधीच्या सरकारनी राजकीय जोखीम उचलली नाही: PM मोदी

https://ift.tt/3CIrQIu
नवी दिल्लीः आजचा नवीन भारत नव्या जगासोबत तत्परतेने चालण्यास सज्ज आहे, असं पंतप्रधान मोदी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या ( ) बैठकीत म्हणाले. जागतिक महामारीच्या या युगात आजची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. मास्क, पीपीई किट, व्हेंटिलेटरपासून लसीकरणापर्यंत, देशाला जे काही आवश्यक असेल, जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा उद्योगांनी पुढे येऊन शक्य ते योगदान दिले. सीआयआयची ही बैठक ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या वातावरणात आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान होत आहे. भारतीय उद्योगाच्या नवीन संकल्पांसाठी, नवीन उद्दिष्टांसाठी ही एक मोठी संधी आहे. स्वावलंबी भारत मोहिमेच्या यशाची मोठी जबाबदारी भारतीय उद्योगांवर आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. आपण आयटी क्षेत्रात रेकॉर्ड भरतीशी संबंधित अहवाल देखील पाहिले आहेत. देशातील डिजिटलायझेशन आणि वाढत्या मागणीचा हा परिणाम आहे. अशा परिस्थितीत आपण या संधींचा वापर करू, दुप्पट वेगाने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू असा आपला प्रयत्न आहे. आजचा नवीन भारत हा नव्या जगासोबत चालण्यासाठी तत्पर आहे. ज्या भारताला कधीकाळी विदेशी गुंतवणुकीबाबत शंका होती आज त्याच भारतात प्रत्येक प्रकारच्या गुंतवणुकीचे स्वागत केले जात आहे, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. जे काही विदेशी आहे, ते चांगलंच आहे, असं म्हणण्याचा एक काळ होता. यामुळे काय मानसिक परिणाम होतो, हे तुमच्यासारख्या उद्योगातील दिग्गजांना खूप चांगलं माहिती आहे. अगदी आपले स्वतःचे ब्रॅण्ड्स जे आपण अनेक वर्षांच्या मेहनतीने उभे केले होते, त्यांना विदेशी नावाने प्रोत्साहन देण्यात आलं. पण आज परिस्थिती वेगाने बदलत आहे. आज देशवासीयांची भावना भारतात बनवलेल्या उत्पादनांशी आहे. कंपनी भारतीय असलीच पाहिजे असे नाही. पण आज प्रत्येक भारतीयाला भारतात बनवलेल्या उत्पादनांना आपलसं करावसं वाटतंय, असं पंतप्रधान मोदींनी उद्योजकांना सांगितलं. देशात आज असे सरकार आहे जे देशाच्या हितासाठी मोठ्यात मोठा धोका पत्करण्यास तयार आहे. जीएसटीची अंमलबजावणी इतकी वर्षे का रखडली. कारण जे आधीच्या सरकारमध्ये होते ते राजकीय जोखीम उचलण्याचे धैर्य दाखवू शकले नाही. आम्ही केवळ जीएसटी लागू केला नाही, तर आज आपण जीएसटीच्या विक्रमी संकलनाचे साक्षीदार आहोत. 'मेक इन इंडिया' सोबतच देशाने निर्यात आणि रोजगाराला चालना देण्यासाठी प्रभावी PLI योजना देखील सुरू केल्या आहेत. या सर्व सुधारणा देशातील सरकार सक्तीने करत नाहीए. तर त्या आमच्यासाठी खात्रीचा विषय आहे. भारतातील आजचा तरुण जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा त्याच्या मनात कुठलाही संकोच नसतो. त्यांना कठोर परिश्रम करायचे आहेत, त्यांना जोखीम घ्यायची आहे, त्यांना निकाल लावायचा आहे. आम्ही या स्थानाचे दावेदार आहोत ही भावना आज आपल्या तरुणांमध्ये दिसते. अशाच प्रकारचा आत्मविश्वास हा भारताच्या स्टार्टअपमध्येही दिसून येतोय, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.