नवी दिल्लीः अफगाणिस्तानमधील अराजक स्थितीने भारताची चिंता ( ) वाढली आहे. तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची ( ) बैठक घेतली. ही बैठक मोदींच्या निवासस्थानी झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवलही उपस्थित होते. यांच्यासह परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि अफगाणिस्तानमधील राजदूत रुद्रेंद्र टंडन ही उपस्थित होते. राजदूत टंडन यांना मंगळवारी सकाळीच काबुलमधून सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात आलं. मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीला अफगाणिस्तानमधील सध्याची आणि विकसित सुरक्षा आणि राजकीय परिस्थिती आणि अलीकडील स्थलांतर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. येत्या काही दिवसांत अफगाणिस्तानातून भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना सांगितलं, अशी माहिती सूत्रांनी दिली. भारताने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसोबत जे भारतात येण्यास इच्छुक आहेत अशा शिख आणि हिंदू अल्पसंख्यकांना आश्रय दिला पाहिजे. आणि आपल्याला शक्य ती सर्व मदत केली पाहिजे. आपल्या अफगाण बंधु आणि भगिनींनाही मदत करावी, जे भारताकडे मदतीसाठी आशेने बघत आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. भारताने काबुलमधील आपल्या दुतावासातील सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढलं आहे. भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या (ITBP) जवानांना दोन विमानांद्वारे मायदेशात आणण्यात आलं. पंतप्रधान मोदींना अफगाणिस्तानमधील स्थितीची सतत अपडेट्स देण्यात येत आहेत, असं सूत्रांनी सांगितलं.