म टा प्रतिनिधी । कोल्हापूर पूरग्रस्तांच्या विविध मागण्यासाठी आक्रोश मोर्चा काढल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजपासून यात्रेस सुरुवात केली आहे. कोल्हापूर नजीक असलेल्या प्रयाग चिखली येथून सकाळी या यात्रेला माजी खासदार यांच्या पुढाकाराने सुरुवात झाली. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान भरपाई तातडीने मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील आठवड्यात कोल्हापूर आणि इस्लामपूर येथे पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढला होता. २०१९ च्या शासन निर्णयानुसार पूरग्रस्तांना मदत करावी, पूरग्रस्त विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी यासह विविध मागण्यांची दखल न घेतल्यास पाच सप्टेंबर रोजी नरसिंहवाडी येथे जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला होता. आठ दिवसात सरकारने कोणताच निर्णय न घेतल्याने अखेर आज जलसमाधी परिक्रमा यात्रेला सुरुवात करण्यात आली. सकाळी प्रयाग चिखली येथे शेट्टी यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही यात्रा सुरुवात सुरू झाली. जिल्ह्यातील विविध भागात फिरून पाच सप्टेंबर रोजी नरसिंहवाडी येथे जाणार आहे. तेथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीचा घटक असलेल्या स्वाभिमानी संघटनेने सरकार विरोधातच आक्रमक भूमिका घेतल्यामुळे महाविकास आघाडीतील वाद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.