कोकणात यंदा आरतीविना साजरा होणार गणेशोत्सव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 3, 2021

कोकणात यंदा आरतीविना साजरा होणार गणेशोत्सव

https://ift.tt/3BIs41j
म. टा. प्रतिनिधी, कोकणातील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य समजल्या जाणाऱ्या सामूहिक आरती, भजन, कीर्तन आणि महासंस्कृती भूषण असलेल्या जाखडी (बाल्या) नृत्याशिवायच यंदा कोकणात साजरा होणार आहे. गर्दी करणारे कार्यक्रम घेऊ नये, असे फर्मान रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयांकडून काढण्यात आले आहे. करोना लशींच्या दोन मात्रा घेतलेल्या गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारच्या चाचणीची आवश्यकता नाही. हा लसधारकांसाठी मोठा दिलासा आहे. मात्र, जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांकडे आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी अहवाल नसल्यास जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर करोनाचाचणी करून त्यांना संस्थात्मक विलगीकरणात राहावे लागेल. चाचणीकरण्यासाठी नागरी कृतिदल तयार करण्यात आले आहे, असे रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी 'मटा'ला सांगितले. जिल्ह्यात सार्वजनिक गणपती बसविण्यात येऊ नये. बसविल्यास तो केवळ दीड दिवसांचा असावा. आरती, भजन, कीर्तन, जाखडी नृत्यांसाठी गर्दी करू नये, गणपती दर्शनासाठी नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या घरी जाऊ नये. गणेश विसर्जन घरातच करावे, घरात शक्य नसल्यास हौद-कृत्रिम तलावात विसर्जन करावे, आगमन-विसर्जन मिरवणूका काढू नयेत, अशा लेखी सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने काढल्या आहेत. महामार्गावरील प्रवेशद्वारावर चाचणी पथक नियुक्त केले आहेत. रस्ते मार्गे येणाऱ्या प्रवाशांची तेथे तपासणी करण्यात येईल. रेल्वेमार्गे येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर तपासणी करण्यात येईल. सध्या गावपातळीवर रोज सरासरी चार ते साडेचार हजार लोकांची चाचणी घेण्यात येत आहे. आज रेल्वे, उद्या एसटी लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबईहून कोकणात जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाने घोषित केलेल्या विशेष रेल्वे आज, शुक्रवारपासून धावणार आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून उद्या, ४ सप्टेंबरपासून गणपती विशेष एसटी रवाना होतील.