पावसामुळे थांबले हिमालय पुलाचे काम - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, September 21, 2021

पावसामुळे थांबले हिमालय पुलाचे काम

https://ift.tt/3nPzKuT
म. टा. विशेष प्रतिनिधी, येथील हिमालय पुलाचे बांधकाम पावसामुळे करता येत नाही. पावसाळ्यात खोदकाम करणे शक्य नसल्याने काम बंद ठेवण्यात आले आहे. पावसानंतर काम पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी हिमालय पूल कोसळून सात प्रवासी मृत्युमुखी पडले, तर ३०हून अधिक जण जखमी झाले होते. पुलाच्या नवीन बांधकामास स्थायी समितीने २१ मे २०२१ रोजी मंजुरी दिली आहे. त्यानंतर पावसाळा सुरू झाला. काही दिवसांपूर्वी अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या भिंतीलगतचे पुलाचे अवशेष पाडण्याचे काम जेसीबीद्वारे सुरू करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलगत पुलाचे उर्वरित अवशेष पाडण्याचे काम सुरू आहे. नवीन पुलासाठी खोदकाम करताना पावसाचा अडथळा येत आहे. मात्र नियोजित कालावधीत काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही पालिकेने दिली आहे. पुलाच्या उभारणीच्या कामाला विलंब होत असल्याचा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीच्या मागील बैठकीत केला होता. तसेच या प्रकरणात दोषी असलेले इंजिनीअर फरार असल्याचा दावाही शिंदे यांनी केला होता. त्यावर पालिकेने लेखी उत्तर दिले आहे. प्रशासनाने स्थायी समितीला सादर केलेल्या प्रस्तावाला ३० दिवसात मंजुरी न दिल्यास प्रस्तावाला स्थायी समितीची आपसूक मंजुरी प्राप्त होते, असे पालिकेचा नियम सांगतो. समितीने मंजुरी दिलेल्या पुलाच्या कामाला ३० दिवसानंतरही सुरुवात होत नसेल, अधिक विलंब होत असेल, तर त्याबाबाबत संबंधित पालिका अधिकाऱ्यांना कोणतीही बंधने नाहीत का, असा सवाल प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला आहे. दोषी इंजिनीअरवर खटला पुलाच्या दुर्घटनेप्रकरणी केलेल्या चौकशीत दोषी आढळून आलेल्या इंजिनीअरवर कायदेशीर खटला भरण्यात आला आहे. त्याबाबतची कार्यवाही पोलिसांकडून होणे अपेक्षित आहे, असे प्रमुख इंजिनीअर (पूल) यांच्यामार्फत स्थायी समितीला लेखी कळविण्यात आले आहे.