म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या मुंबईमध्ये सध्या उष्म्याबरोबर राजकीय वातावरणही चांगेलच तापले आहे. गल्लीबोळात सुरू असलेल्या राजकीय सभा, लागोपाठचे धार्मिक सण, राजकीय नेत्यांचे इशारे, विविध संघटनांची आंदोलने यामुळे मुंबईत कोणत्याही क्षणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या १५ ते २० दिवसांपासून मुंबईतील गुन्हे रोखण्यापासून, बंदोबस्त, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. नेहमीच्या तुलनेत राखीव पोलिसांचा फौजफाटा असो व एसआरपीएफच्या तुकड्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यानंतर पोलिसांकडून दुर्लक्ष झाल्याचे समोर आले. त्यानंतर १४ एप्रिलपासून आंबेडकर जयंती, महावीर जयंती, गुड फ्रायडे, हनुमान जयंती, ईस्टर संडे आणि आता पुढील महिन्यात येणारी रमझान ईद असे सर्वधर्मियांचे सण एकापाठोपाठ आले. याचदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला. यावरून मुंबईसह राज्यातील राजकारण आणखी तापले. ठाकरे यांनी ३ मेपर्यंत भोंगे न उतरविल्यास लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला. राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि सणांच्या कालावधीत वातावरण बिघडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी सावधगिरी बाळगली. मुंबईत कडक बंदोबस्त ठेवतानाच रेकॉर्डवरील, सराईत गुन्हेगार, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना ताब्यात घेण्यात आले. मोहल्ला कमिटी, शांतता कमिटी, सामाजिक संस्था, उत्सव मंडळाचे पदाधिकारी, सर्वधर्मीय धर्मगुरू यांच्याबरोबर बैठका घेण्यात आल्या. सायबर पोलिसांमार्फत सोशल मीडियावर नजर ठेवून अनेक तेढ वाढविणाऱ्या पोस्ट हटविण्यात आल्या. पोलिसांनी सावधगिरी घेतली असतानाच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणाचा इशारा दिल्यानंतर पुन्हा वातावरण बिघडले. रमजान महिना सुरू असतानाच पुन्हा कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची भीती असल्याने पोलिस अधिक सतर्क झाले. राणा यांचा हट्ट, त्यांच्या घराबाहेरील आंदोलन, भाजप नेते किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्यावरील हल्ला यामुळे पोलिसांचे काम चांगलेच वाढले. दोन दिवसांच्या कडक बंदोबस्तानंतर मुंबईतील परिस्थिती निवळली असली तरी पोलिसांना गाफील राहून चालणार नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. राखीव पथके सतर्क धार्मिक तेढ, कायदा आणि सुव्यस्था अडचणीत येण्याची परिस्थिती निर्माण होण्याच्या काळात नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांबरोबर एसआरपीएफच्या १९ कंपन्या मुंबईत तैनात करण्यात आल्या आहेत. दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल याचबरोबर प्रत्येक विभागातील पोलिसांना सतर्क ठेवण्यात आले आहे.