गुजरात दंगलीतील बिलकिस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ दोषींची सुटका, कसे सुटले, काय होती घटना? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, August 16, 2022

गुजरात दंगलीतील बिलकिस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ दोषींची सुटका, कसे सुटले, काय होती घटना?

https://ift.tt/xg4rY7s
अहमदाबाद : गुजरातमध्ये गोध्रा दंगलीवेळी बिलकिस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी सजा भोगत असलेल्या ११ दोषींची आज सुटका करण्यात आली आहे. गुजरात सरकारच्या माफी धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला. गुजरात सरकारच्या या निर्णयानंतर ११ दोषी गोध्रा तुरुंगातून बाहेर पडले. गुजरातमध्ये २००२ मध्ये गोध्रा दंगल झाली होती. ३ मार्च २००२ मध्ये दाहोद जिल्ह्यातील रंधिकपूर गावात बिलकिस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. तर, त्यांच्या कुटुंबातील सात लोकांची हत्या करण्यात आली होती. बिलकिस बानो यांच्यावर बलात्कार झाला त्यावेळी त्या पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या. राधेश्याम शाही, जसवंत चतुरभाई नाई, केशुभाई वदानिया, बकाभाई वदानिया, राजीवभाई सोनी, रमेशभाई चौहान, शैलेशभाई भट्ट, बिपिन चंद्र जोशी, गोविंदभाई नाई, मितेश भट्ट आणि प्रदीप मोढिया यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. आरोपींना २००४ मध्ये अटक करण्यात आली होती. अहमदाबादमध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरु झाली होती. मात्र, बिलकिस बानो यांनी साक्षीदारांवर दबाव आणला जाईल, असं म्हटल्यानं आणि सीबीआयकडून जमा केलेल्या पुराव्यांशी छेडछाड हऊ शकते, अशी शंका व्यक्त केल्यानं सुप्रीम कोर्टानं ऑगस्ट २००४ मध्ये हे प्रकरण मुंबईला वर्ग करण्यात आलं होतं. २१ जानेवारी २००८ मध्ये मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयानं ११ आरोपींना दोषी ठरवलं होतं. या प्रकरणी त्यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मुंबई हायकोर्टानं देखील ही शिक्षा कायम ठेवली होती. या दोषींनी १८ वर्षांचा तुरुंगवास भोगला होता. राधेश्याम शाही यानं कलम ४३२ आणि ४३३ अन्वये सजा माफ व्हावी म्हणून गुजरात हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, तिथे निर्णय न झाल्यानं त्यानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. १ एप्रिल २०२२ पर्यंत श्याही यानं १५ वर्ष ४ महिने तुरुंगवास भोगला होता. सुप्रीम कोर्टानं गुन्हा गुजरातमध्ये घडल्यानं गुजरात सरकार निर्णय घेऊ शकतं असं म्हटलं होतं. सुप्रीम कोर्टानं ९ जुलै १९९२ च्या माफी धोरणानुसार अर्जावर विचार करण्याचे निर्देश दिले होते. दोन महिन्यात याबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. पंचमहल जिल्हाधिकारी सुजल मायात्रा यांनी सर्वोच्च न्यायालयानं गुजरात सरकारला निर्णय घ्यायला सांगितलं होतं. त्यानंतर सरकारनं एक समिती बनवली त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी होते. समिती सदस्यांनी एकमतानं दोषींची सुटका करण्याचा निर्णय घेत शिफारस सरकारला केली होती. त्यानंतर त्यांच्या सुटकेचे आदेश देण्यात आले.