
बुलढाणा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या वक्तव्यामुळं राजकीय क्षेत्रात वादळ उठलं आहे. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, राज्यातील मराठा संघटना, मनसे आणि सामाजिक संघटनांनी राज्यपाल आणि त्रिवेदी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. राज्याच्या सत्तेत विराजमान असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपनं सावध भूमिका घेतली. चंद्रशेखर बावनकुळेंनी जळगावात पत्रकारांशी बोलताना सारवासारव केली. तर, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं सांगितलं. शिंदे गटानं राज्यपाल आणि त्रिवेदी प्रकरणावर सावध भूमिका घेतली असताना आमदार यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना इशारा दिला आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला. राज्यपालांनी शिवाजी महाराजांच्याबद्दल आतापर्यंत तीनदा एकेरी उल्लेख केला. छत्रपती जुने झालेत असं वक्तव्य राज्यपालांनी केलं आहे. शिवविचार जुना होत नसतो, त्यांची तुलना जगातील कुठल्याही महापुरुषासोबत होऊ शकत नाही. ज्या व्यक्तीला राज्याच्या इतिहासाबद्दल माहिती नाही, त्याला राज्यपाल पदावरुन घालवावं, असं संजय गायकवाड म्हणाले. भाजपचे केंद्रीय नेते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात जी भाषा वापरली ती चुकीची आहे. सावरकरांनी जशी पत्र लिहिली होती तशी पत्र शिवाजी महाराजांनी लिहिल्याची भाषा त्रिवेदींनी वापरली त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. औंरगजेबाच्या दरबारात कोणी ताठ मानेनं उभं राहत नव्हतं. त्या काळात शिवाजी महाराजांनी ताठ मानेनं उभं राहून औरंगजेबाला सुनावलं होतं. जीवनात माफीनाम्याच्या मागं लागले नाहीत. भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल असतील किंवा त्रिवेदी असतील त्यांनी महाराजांबद्दल विचार करुन बोललं पाहिजे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या लक्षात आम्ही ही बाब आणून देणार आहोत.शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. अशा प्रकारच्या वक्तव्यामुळं दोन्ही पक्षांमध्ये वितुष्ट निर्माण होईल, याचे परिणाम दोघांना भोगावे लागतील, असं संजय गायकवाड म्हणाले.