‘भारत-चीन सीमेवर सैन्य कोणी पाठवले?’; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा राहुल गांधी यांना सवाल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 20, 2022

‘भारत-चीन सीमेवर सैन्य कोणी पाठवले?’; परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा राहुल गांधी यांना सवाल

https://ift.tt/k6rcX5W
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्लीः चीनच्या घुसखोरीविषयी सरकार उदासीन असेल, तर भारतीय लष्करी जवानांना सीमेवर कोणी पाठवले, असा सवाल करीत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विधानावर सोमवारी लोकसभेत रोष व्यक्त केला. दुसरीकडे जयशंकर यांच्या पुत्राच्या संस्थेने चीनच्या दूतावासाकडून अलीकडेच तीन वेळा निधी घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ‘आम्हाला राजकीय मतभेद किंवा टीकेचीही चिंता नाही. मात्र, आमच्या जवानांचा अपमान व्हायला नको. जवानांसाठी ‘पिटाई’ या शब्दाचा वापर करणे योग्य नाही. जर आम्ही चीनविषयी उदासीन आहोत तर भारतीय सैनिकांना सीमेवर कोणी पाठवले? आज आम्ही सीमेवरील तणाव निवळण्यासाठी आणि संघर्ष टाळण्यासाठी दबाव का आणत आहोत? भारत आणि चीनदरम्यानचे संबंध सामान्य नाहीत, असे आम्ही जाहीरपणे का सांगत आहोत?,’ असे सवाल एस. जयशंकर यांनी लोकसभेत उपस्थित केले. ‘आपल्या जवानांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे टीका करायला नको. यांगत्से येथे १३ हजार फूट उंचीवर उभे राहून ते सीमेचे रक्षण करीत आहेत. त्यांचा सन्मान आणि प्रशंसा केली पाहिजे,’ असे सांगून जयशंकर यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले. भारत-चीन सीमेवर उभय देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीचे वृत्त आल्यापासून राज्यसभेत विरोधी पक्ष सतत गोंधळ घालत आहेत. सोमवारी राज्यसभेचे कामकाज सुरू होताच चीनच्या मुद्द्यावरून पुन्हा गोंधळ झाला. नियम २६७ अंतर्गत चर्चेची मागणी सभापती धनकड यांनी फेटाळल्यामुळे राज्यसभेत विरोधी पक्षांनी सभात्याग करून निषेध नोंदविला. ‘चीनने आमची जमीन बळकावली आहे. या मुद्द्यावर चर्चा करणार नाही, तर कोणत्या विषयावर करणार,’ असा सवाल करून, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप केला. चीनच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष अत्यंत खालच्या पातळीवरील राजकारण करीत असल्याचा आरोप राज्यसभेचे नेते पीयूष गोयल यांनी केला. ‘अनेक गंभीर विषयांवर यूपीए सरकारच्या काळातही चर्चा होत नव्हती. राजनाथ सिंह यांनी चीनच्या मुद्द्यावर निवेदन केल्यानंतर त्या विषयाला विराम मिळायला हवा होता. पण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आपल्या जवानांना हतोत्साहित करीत आहेत. राहुल गांधी यांनी केलेले विधान त्यांचे मनोधैर्य खचविणारे असल्याचे माझे मत आहे,’ असे गोयल म्हणाले. जयशंकर यांच्या पुत्रावर आरोप ‘परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे पुत्र ज्या फाउंडेशनच्या एका शाखेचे अमेरिकेत नेतृत्व करतात, त्या संस्थेने चीनच्या दूतावासाकडून अलीकडेच तीन वेळा पैसे घेतले की नाही, याचे मोदी सरकार आणि जयशंकर यांनी उत्तर द्यावे,’ अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी केली. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक लोकांचा समावेश असलेल्या इंडिया फाउंडेशनचे चीनशी कोणते संबंध आहेत, या फाउंडेशनचे लोक वारंवार चीनला का जातात, पूर्ण सरकार चीनबाबत गप्प होते याचे काय कारण आहे,’ असे प्रश्न खेडा यांनी उपस्थित केले.