
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 'लोक माझ्या सांगाती' या आत्मचरित्राचा पहिला भाग मागेच प्रकाशित झाला आहे. या आत्मचरित्राचा सुधारित किंवा उत्तरार्ध म्हणता येईल, असा दुसरा भाग मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मंगळवारी प्रकाशित झाला. या भागात बरेच गौप्यस्फोट आहेत. ते अनेकांना अडचणीचेही ठरू शकतात. मात्र, या साऱ्या गौप्यस्फोटांच्या वरताण असा स्फोट पवारांनी कार्यक्रमात केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणातले इतके दिवस कनातीआड चाललेले एक नाट्य साऱ्या महाराष्ट्रासमोर, लाईव्ह सादर झाले. ऐन माध्यान्ही सुरू झालेल्या या नाटकाने सायंकाळी सहाच्या सुमारास अर्धविराम घेतला. शरद पवार यांच्या मनात नेमके काय होते, हे कळायला मार्ग नाही. पण 'राष्ट्रवादी काँग्रेस'मधील कार्यकर्ते आणि बरेच नेते आत्ता या घडीला कोणाच्या सांगाती आहेत, याचा प्रत्यय देणारा एक धक्काप्रयोग महाराष्ट्रासमोर सादर झाला आहे. पवारांचे पुतणे अजित पवार यांची ऐतिहासिक पहाटेच्या शपथविधीपासून जी राजकीय कोंडी चालू आहे; ती शरद पवार यांच्या राजीनाम्याने संपणार होती का, या प्रश्नाचे उत्तर आता मिळणार नाही. उलट, त्या व्यासपीठावर आणि गळे भरून येणाऱ्या नेत्यांच्या गर्दीत अजितदादा एकटे पडले आहेत, हे स्पष्ट दिसत होते. त्यामुळेच, त्यांचा आवाज चढत होता. ते कार्यकर्त्यांना झापत होते. आपण कुजबुजतो आहोत, तेही महाराष्ट्र ऐकतो आहे, याचे भानही त्यांना राहिले नव्हते. दिवस मावळला तेव्हा शरद पवार यांची पक्षावरची पकड अधिक भक्कम झाली आणि अजित पवार यांचे आणि त्यांच्या पाठिराख्यांचे राजकारण अधिक अवघड होऊन बसले. त्यांचे दृश्य एकाकीपण सूर्यास्ताला अधिकच गहिरे झाले.शरद पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे केवळ अध्यक्ष नाहीत. तेच 'सर्वेसर्वा' आहेत. हे त्यांनी आधी अनेकदा दाखवून दिले आहे. काही नेत्यांना व्यासपीठावरच आईचे बोट सुटलेल्या बालवाडीतल्या मुलांसारखे जे रडू कोसळले; त्यातून पवारांची पक्षावरची पाखर लक्षात येत होती. ही दृश्ये महाराष्ट्राने पाहिली तेव्हा जागोजागी राजीनाम्याच्या घोषणा होऊ लागल्या. उपोषणे सुरू झाली. शेकडो कार्यकर्ते मुंबईत येण्याच्या तयारीला लागले. हे सारे शरद पवार यांना अनपेक्षित असेलच, असे नाही. प्रफुल पटेल म्हणाले त्याप्रमाणे शरद पवार राज्यसभेत राहणार असले तरी पक्षाध्यक्षपद सोडणे, हा त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीचा औपचारिक समारोप होता. तो व्यवस्थित व्हावा, अशी अपेक्षा असती तर तो नीट प्लॅन करता आला असता. त्याचा नीट समारंभ करता आला असता. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात धक्कातंत्र वापरून शरद पवार यांच्यासारखा दिग्गज नेता अचानक निवृत्त होऊ शकत नाही. शरद पवार यांनी आपले छापील भाषण लिहिताना ज्यांना विश्वासात घेतले होते; त्या तिघांनाही या तीव्र प्रतिक्रियेचा अंदाज यायला हवा होता. हा अंदाज असलाच तर एकट्या शरद पवारांनाच असावा. सभागृहात इतका गोंधळ होऊनही, कुणी रडत असताना, कुणी कार्यकर्त्यांवर-बहिणीवर ओरडत असताना त्यांच्या चेहऱ्यावरची शांती ढळली नाही. ते सारे निरखत होते. प्रतिभाताई पवार यांच्या व्यक्तिमत्वाची संयत, प्रभल्भ बाजूही महाराष्ट्राने यावेळी पाहिली. ती बऱ्याच नेत्यांच्या घरच्यांसाठी जाहीर शिकवणीच होती.आता पुढे काय, हा खरा प्रश्न आहे. शरद पवार यांनी नवा अध्यक्ष नेमण्यासाठी आपल्या भाषणात जी समिती नेमली आहे, तिला काहीही अर्थ नाही. छगन भुजबळ तर हे स्पष्टच म्हणाले. ही समिती राहिली असती तर पक्षाचे अध्यक्षपद कुणाकडे गेले असते किंवा या समितीने शरद पवार यांचाच शब्द अखेरचा मानला असता का, हे प्रश्नही आता निरर्थक आहेत. दोन-तीन दिवसांत शरद पवार 'विचार करून' काय करणार, हे पाहायला हवे. 'आपण या वयात काही वेगळा निकाल घेऊ शकत नाही,' असे ते मध्यंतरी म्हणाल्याचे काही जण सांगत होते. ते खरे असेल तर 'इतरांना मार्ग मोकळा आहे,' हे त्यातले गर्भित विधान आहे. शरद पवार यांचा 'आता जेवण करा. घरी जा.' हा निरोप घेऊन सायंकाळी अजित पवार चव्हाण सेंटरमध्ये आले तेव्हा 'मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार,' हा खुलासा पुन्हा एकदा करताना त्यांचा आवाज चांगलाच तापलेला होता. ताकदवान काका आणि महत्त्वाकांक्षी पुतण्या यांच्या नात्याला काकांच्या स्वत:च्या मुलाचा तिसरा कोन असतो, तेव्हा काय होते, हे महाराष्ट्राने यापूर्वी पाहिले आहे. तेच पुन्हा दिसले तर आश्चर्य नाही. आता शरद पवार यांनी हा राजीनामा मागे घेतला नाही तर पुन्हा महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन सुरू होईल. शरद पवार यांचा राजकीय वारस ठरण्याची लढाई ही आता अशी अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. तिचा निकाल काहीही लागला तरी ती किती चित्तथरारक होणार आहे, याचा वानोळा महाराष्ट्राने प्रत्यक्ष अनुभवला. असे कधी झाले नव्हते. लोक, नेते आणि मीडिया यांची ही अनोखी संगत आहे!