
लातूर: लातूर आणि धाराशीव जिल्ह्यातील महाप्रलयंकारी भूकंपास ३० सप्टेंबर रोजी ३० वर्षे पूर्ण होत आहेत. भूकंपानंतर या भागात तातडीने मदतकार्य उभारण्यात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची भूमिका महत्वाची होती. पवार या भागातील प्रत्येक गरजूला मदत पोहचेपर्यंत अहोरात्र कार्यरत होते. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शनिवार ३० सप्टेंबर रोजी किल्लारी (जि. लातूर) येथे कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भूकंपग्रस्त कृती समितीच्या सक्षणा सलगर यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. सलगर म्हणाल्या, की ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या भूकंपात लातूर आणि धाराशीव जिल्ह्यातील अनेक गावे उद्ध्वस्त झाली. हजारो जणांनी प्राण गमावले. भूकंपाची वार्ता कळताच दोन तासात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार धावून आले. भूकंपग्रस्त भागाच्या नवनिर्मितीसाठी स्वतः शरद पवारांनी पुढाकार घेतला. भूकंपग्रस्तांच्या भल्यासाठी जे केले त्याचे वर्णन करण्यास शब्दही अपुरे पडतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शनिवारी सकाळी दहा वाजता किल्लारी येथील होईल. विनायकराव पाटील कवठेकर म्हणाले, की हा सोहळा अराजकीय आहे. सोहळ्यासाठी लातूर-धाराशिव जिल्ह्यातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनीधींना निमंत्रित करण्यात आले आहे. आम्ही सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी गेल्यानंतर पवार यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला, असे त्यांनी सांगितले. सुभाष पवार, अॅड. राहुल मातोळकर, संजय शेटे, राजा मणियार, राज राठोड आदींची उपस्थिती होती.