म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : हवाई इंधनाच्या दरात वाढ झाल्याने येत्या काळात विमान तिकीट किमान ३०० रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. या वधारलेल्या तिकिटदरांची सर्वाधिक झळ नवरात्र, दिवाळी तसेच त्यानंतर डिसेंबर महिन्यात पर्यटनास जाणाऱ्या प्रवाशांना बसू शकते.मुंबईत जून महिन्यात ९५ रुपये प्रति लिटरपर्यंत घसरलेले हवाई इंधनाचे दर जुलैपासून वाढत गेले आहेत. सध्या हे दर ११० रुपये प्रति लिटर इतके आहेत. जूनपर्यंत इंधनदरात घट झाल्याने अनेक विमानसेवा कंपन्यांनी तिकिटांचे दरही काही प्रमाणात घटवले होते. आता मात्र इंधन महागले असताना आगामी काळ प्रवासीसंख्येतील वाढीचा आहे. त्यामुळे विमान कंपन्यांनी इंधन दरवाढीतील नुकसान भरून काढण्यासाठी इंधन अधिभारात वाढ करून तिकीट महाग करण्यास सुरुवात केली आहे. इंडिगो एअरलाइन्सने याची सुरुवात केली आहे. इंडिगोने विविध श्रेणीत ३०० रुपये ते १ हजार रुपयांपर्यंत इंधन अधिभार वाढवून तिकीट महाग केले आहे. अशीच दरवाढ आता अन्य कंपन्या करण्याची चिन्हे आहेत. सध्या भारतात प्रवासी श्रेणीत बोइंग ७३७ व एअरबस ३२० ही मध्यम आकाराची व १६० ते १८० आसन क्षमता असलेली विमाने सर्वाधिक वापरली जातात. या विमानांना साधारणत: ७ लिटर इंधन जाळल्यानंतर एक किलोमीटर उड्डाण शक्य असते. एका तासाच्या उड्डाणासाठी जवळपास ३१०० लिटर इंधनाची गरज भासते. मुंबईहून गोवा, सुरत, अहमदाबाद, नागपूर, कोल्हापूर हे तासाभराच्या उड्डाण अंतरावर आहे. त्यानुसार इंधनदरात प्रति लिटर १५ रुपये वाढीचा विचार केल्यास एका प्रवासासाठी विमानाचा खर्च ४६ हजार ५०० रुपयांनी वाढला आहे. १६० प्रवाशांचा विचार केल्यास प्रति प्रवासी विमान कंपन्यांच्या खर्चात २९० ते २९५ रुपये वाढ झाली आहे. त्यानुसार तासाभराच्या उड्डाणासाठीचे तिकीट येत्या काळात ३०० रुपयांनी महागणार, असे स्पष्ट संकेत या क्षेत्रातील विमान प्रवास सुविधादार व्यावसायिकांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिले आहेत.‘इंडिगो’कडून प्रति प्रवासी इंधन अधिभारकिमी श्रेणी अधिभार (रुपयांत)०-५०० ३००५०१-१००० ४००१००१-१५०० ५५०१५०१-२५०० ६५०२५०१-३५०० ८००३५०० व अधिक १०००