
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईच्या हवेमध्ये दोन दिवसांपासून बिघाड झाल्याचे चित्र असून कुलाबा, वरळी, वांद्रे-कुर्ला संकुल येथे अधिक परिणाम दिसत आहे. पावसाळी हवा प्रदूषके वाहून नेते. मात्र आता कोरडे वातावरण निर्माण होईल, तसेच दिवाळी, त्यानंतर फटाक्यांपासून, शेकोट्या, शेतजमिनी जाळल्याने होणारे प्रदूषण याचा परिणाम दिसू लागेल. या पार्श्वभूमीवर 'रेस्पायरर लिव्हिंग सायन्स' आणि 'क्लायमेट ट्रेण्ड्स' यांनी २०१९ ते २०२३ या वर्षांतील ऑक्टोबर ते मार्च या कालावधीचा अभ्यास केला. यामध्ये मुंबईच्या हवेचा दर्जा या काळात ढासळलेला दिसून आला. ही सातत्यपूर्ण घसरण असून या तुलनेत दिल्ली आणि लखनऊचा दर्जा मात्र सुधारल्याचे आढळले.'राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमा'अंतर्गत गेल्या संपूर्ण वर्षातील पीएम २.५ची नोंद आणि ऑक्टोबर ते मार्च दरम्यानची प्रदूषण पातळी या आधारे हा अभ्यास करण्यात आला. देशातील सहा महत्त्वाच्या शहरांमध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम राबवण्यात आला होता. यामध्ये मुंबईसह दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू, लखनऊ आणि पाटणा या शहरांचा समावेश होता. या अभ्यासावरून दिल्ली प्रदूषणाच्या यादीमध्ये अजूनही पहिल्या क्रमांकावर असल्याचे निदर्शनास आले. मात्र दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेत हळुहळू सुधारणा होत असल्याचे १ ऑक्टोबर २०२२ ते ३० सप्टेंबर २०२३ या दरम्यान आढळून आले. पाटणा शहराचा या यादीत दुसरा क्रमांक आहे. पहिल्या १० क्रमांकांमध्ये मुंबईचा समावेश नाही. यामध्ये गंगेच्या खोऱ्यातील शहरांचा क्रमांक आहे. दिल्ली, तसेच बिहारमधील सात शहरे यामध्ये आहेत. तर ऐझवाल हे भारतातील सर्वांत स्वच्छ हवा असलेले शहर आहे. येथे पीएम २.५ची पातळी केवळ ११ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर इतकी आहे.यंदा १ ऑक्टोबरपासून केंद्र सरकारचा 'ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन' हा सुधारित हवा प्रदूषण नियंत्रण कार्यक्रम दिल्ली आणि लगतच्या २४ जिल्ह्यांमध्ये राबवला जात आहे. पीएम २.५चा मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होतो. त्यासाठी पीएम २.५ आणि पीएम १०चे प्रमाण ४० टक्क्यांनी कमी करण्यासाठी कार्यक्रम राबवण्यात येत आहे. १ ऑक्टोबर २०२२ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत दिल्ली, फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा, मेरठ, पाटणा, मुझफ्फरपूर, आसनसोल, ग्वाल्हेर या शहरांचा पहिल्या १० प्रदूषित शहरांमध्ये क्रमांक आहे.पीएम २.५च्या पातळीत ६० टक्के वाढ:१ ऑक्टोबर २०२२ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत दिल्लीत सर्वाधिक म्हणजे १००.१ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर अशी पीएम २.५ची पातळी नोंदली गेली. हा स्तर जागतिक आरोग्य संघटनेने निर्धारित केलेल्या प्रमाणकापेक्षा २० पट अधिक आहे. मुंबईचा स्तर यापेक्षा चांगला असला, तरी २०१९ ते २०२२ या काळात पीएम २.५च्या पातळीत वाढ झाली आहे. त्यावरून हवेचा दर्जा घसरल्याचे लक्षात येते. सन २०१९मध्ये पीएम २.५ची पातळी ५०.२ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर होती. ती सन २०२३मध्ये ८०.६ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरवर पोहोचली. ही वाढ सुमारे ६० टक्के आहे. या तुलनेत लखनऊ, कोलकाता येथे गेल्या दोन वर्षांत पीएम २.५ची पातळी घटल्याचे दिसते. त्यामुळे मुंबईच्या प्रदूषण स्रोतांचा विचार करून कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.