खासदार संजय जाधवांनी १० वर्षात कधीच तोंड उघडले नाही, कारण त्यासाठी जे लागते...रत्नाकर गुट्टेंची कडाडून टीका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, April 23, 2024

खासदार संजय जाधवांनी १० वर्षात कधीच तोंड उघडले नाही, कारण त्यासाठी जे लागते...रत्नाकर गुट्टेंची कडाडून टीका

https://ift.tt/MCOjL7J
परभणी (धनाजी चव्हाण) : महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव हे मागील दहा वर्षापासून परभणी लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. दहा वर्षांपैकी तब्बल सात वर्ष ते भाजपसोबत सत्तेत होते. पण या सात वर्षाच्या काळात संजय जाधव यांनी सभागृहात कधीच तोंड उघडले नाही. कसल्याही प्रकारचा विकास केला नाही. स्वतःचा निधी देखील ४२ टक्के अखर्चित ठेवला. ते तोंड उघडून इच्छित नाहीत की तोंड उघडण्यासाठी जे लागते ते त्यांच्याकडे नाही, असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्यावर कडाडून टीका केली आहे. रत्नाकर गुट्टे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून परभणी लोकसभा मतदारसंघातील मतदारांना महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन करत असताना त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्यावर कडाडून टीका देखील केली. पुढे बोलताना रत्नाकर गुट्टे म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील मतदारांनी केंद्रामध्ये जे सरकार येणार आहे, त्याचाच खासदार निवडून द्यावा. कारण केंद्रात जे सरकार राहील त्या सरकारच्या माध्यमातून परभणी लोकसभा मतदारसंघाचा विकास झपाट्याने होऊ शकतो. विरोधी पक्षाचा उमेदवार निवडून देऊन परभणीला आणखीन विकासापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू नये. सध्या मी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचा आमदार आहे, यासोबत जर जानकर खासदार झाले तर हे डबल इंजिन मिळून परभणी जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर रत्नाकर गुट्टे यांनी परभणी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना देखील अश्वस्त केले की, महादेव जानकर निवडून आल्यानंतर जिल्ह्यातील कोणत्याही व्यापाऱ्याला पट्टी मागितली जाणार नाही. आतापर्यंत बऱ्याच वेळेस व्यापाऱ्यांकडून मोठमोठ्या देणग्या घेऊन कार्यक्रम घेण्यात आले. त्यामुळे व्यापाऱ्यांना प्रचंड आर्थिक दंड सोसावा लागला. पण जानकर निवडून आल्यानंतर कितीही मोठा कार्यक्रम घेतला तरी व्यापाऱ्यांकडून एक रुपयाची देखील पट्टी घेतली जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर परभणी जिल्ह्याचा विकास करण्यासाठी जिल्ह्यातील कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी आणून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल असेही ते म्हणाले. पर्यटनाच्या दृष्टीने देखील परभणी जिल्ह्यामध्ये संत जनाबाईचे मंदिर आहे जांभूळ बेट आहे त्याचा विकास करण्याचा देखील निर्धार गुट्टे यांनी व्यक्त केला. परभणी जिल्हा सध्या प्रचंड अविकसित राहिला आहे. परभणी शहराच्या अवस्था तर बकाल झाली असून शहरांमध्ये रस्ते आहेत की खड्डे आहेत, असे म्हणावे लागेल. जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत तर नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न देखील प्रचंड निर्माण झाले आहेत. पिण्याचे पाणी देखील आठ-आठ दिवस नागरिकांना मिळत नाही. आणि अशा परिस्थितीत परभणीकर आपले जीवन जगत आहे. वर्षानुवर्ष निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी परभणी जिल्ह्याचा विकास केला नाही. त्यामुळे आता बदल घडवायचा आहे आणि तो बदल घडून आणला तरच जिल्ह्याचा विकास शक्य होईल असेही रत्नाकर गुट्टे म्हणाले.