
दिशा सालियान प्रकरणात सीबीआयने एफआयआर नोंदवला. या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरेंसह अनेकांची नावं आहेत. त्या संदर्भात आज शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांना पत्रकारांनी विचारलं. “अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या बाबतीत काय झालं होतं? मुद्दामून राजकीय दृष्टीकोनातून आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं होतं. क्लीनचीट मिळाली. आताही दिशा सालियानच्या बाबतीत क्लीनचीट मिळेल. सीबीआयवर विश्वास नसला, तरी न्यायालयावर आमचा विश्वास आहे. पुढच्या तीन वर्षात कुठलीही निवडणूक नसताना आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं जात असेल तर लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका मुदतीआधी होतील की काय असं वाटू लागलय” असं रोहित पवार म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अजूनही सुटलेलं नाही. त्यावर रोहित पवार म्हणाले की, “मनोज जरांगे यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. लोकांना येता-जाताना अडचणी सोसाव्या लागल्या. हॉटेल, रेस्टॉरंट तिथे होते. चहापणी बंद केलं” “स्वच्छतागृहाचं नियोजन नव्हतं. सरकारने लवकर यावर निर्णय घ्यावा. जरांगेंचं उपोषण पुढे न्यायचं की नाही हा सरकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा निर्णय आहे” असं रोहित पवार म्हणाले.
मग, पूर्णसत्य काय देसाईसाहेबांनी सांगावं
मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले की, मनोज जरांगे पाटील हे अर्धसत्य बोलत आहेत, त्यांना भेटून त्यांचे गैरसमज दूर करणार यावरही रोहित पवार बोलले. “अर्धसत्य त्यांना वाटत असेल, तर पूर्णसत्य काय हे देसाईसाहेबांनी मीडियासमोर येऊन सांगावं. काय चर्चा झाली हे लोकांसमोर येणं महत्वाच आहे. महत्वाचं म्हणजे त्यातून मार्ग काढला पाहिजे” असं रोहित पवार म्हणाले.
निर्णय घेण्याची ताकद त्यांच्यात आहे
“मीडियात अर्धसत्य बोलून चालत नाही. सत्ता त्यांच्याकडे आहे. निर्णय घेण्याची ताकद त्यांच्यात आहे. स्पष्टता सर्व विषयात आणली पाहिजे. समाजाला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत” असं रोहित पवार म्हणाले. “अवकाळी पाऊस झालेला त्याची मदत अजून मिळालेली नाही. MPSC चे विद्यार्थी लढत आहेत. सर्व समाजाच्या घटकांना वेगवेगळ्या अडचणी सोसाव्या लागत आहेत. सरकारकडून जर तो निर्णय घेतला जात नसेल, तर सरकार मुद्दामून तो विषय लांबवतय की काय असं वाटतं” असं रोहित पवार म्हणाले.