नवी दिल्ली: जागा वाटपावरून निर्माण झालेली शिवसेना-भाजप युतीची कोंडी अखेर फुटली असल्याचं वृत्त आहे. नव्या फॉर्म्युल्यानुसार १४४, १२६ आणि इतर १८ जागांवर लढणार असल्याचं आज झालेल्या भाजपच्या बैठकीत नक्की झाल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं. मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरू आहे. गेल्या नऊ तासांपासून सुरू असलेल्या या बैठकीत शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत सोबत घेण्याचं नक्की झालं असून सेनेला १२६ जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर भाजपने १४४ जागांवर लढण्याचं ठरलं असून रिपाइं, रासप, शिवसंग्राम आणि रयत क्रांती सेनेला मिळून १८ जागा सोडण्यावरही या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. मात्र सध्या पितृपक्ष सुरू असल्याने रविवारी युतीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. ठाकूर यांची जागा देसाईंसाठी सोडणार दरम्यान, शिवसेना-भाजप दरम्यान काही जागांची आदलाबदली होणार आहे. शिवसेनेने गोरेगाव विधानसभा मतदारसंघ सुभाष देसाई यांच्यासाठी सोडण्याची अट भाजपला घातली होती. शिवसेनेची ही अट भाजपने मान्य केल्याचंही सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे भाजपच्या नेत्या आणि मंत्री विद्या ठाकूर यांना यंदा तिकीट नाकारण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येतं. पुण्यातही शिवसेनेचा एकही आमदार नसल्याने पुण्यातही शिवसेनेसाठी काही जागा सोडणअयाची तयारी भाजपने दाखवल्याचं सांगण्यात येतं. शिवसेना आणि मित्रपक्षांनासोबत घेऊनच निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय भाजपने घेतला असून त्यासाठी काही विद्यमान आमदारांना भाजपकडून तिकीट नाकारण्यात येणार असल्याचीही खात्रीलायक माहिती आहे.