पुणे: ‘इडी’चा अर्थ ‘इन्फोर्समेंट डिरेक्टोरेट’ असा असून ‘इव्हेंट डेव्हलपमेंट’ नाही, असा टोला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांना लगावला. अजित पवारांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षातील विषय असला तरी, एका पक्षात दोन प्रधान, दोन निशाण, दोन संविधान चालू शकत नाही म्हणून, पक्षातले कलम ३७० हटविले, मग देशात कलम ३७० हटविण्याचा विरोध कशासाठी, असा खोचक सवालही त्यांनी केला. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्दबातल ठरविल्यानंतर भाजपतर्फे देशभरात राष्ट्रीय एकता अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत कलम ३७० हटविल्याचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले जात आहेत. त्या अंतर्गत संबित पात्रा यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. खासदार गिरीश बापट, संजय काकडे, भाजपचे प्रदेश सचिव राजेश पांडे उपस्थित होते. काँग्रेसने कलम ३७० हटविण्यास विरोध केला होता. पण शरद पवार यांनीही कलम ३७० हटविण्याच्या निर्णयाला पाठिंबा का दिला नाही, असा सवाल महाराष्ट्रातील जनतेने निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला विचारावा, असे म्हणत संबित पात्रा यांनी दोन्ही पक्षांवर जोरदार टीका केली. अब्दुल्ला परिवार, मुफ्ती परिवार आणि गांधी परिवाराने जम्मू-काश्मीरमध्ये भ्रष्टाचार वाढविला. त्यामुळे तेथील सर्वसामान्य विकासापासून वंचित राहिले. केवळ मोदी-शहा यांच्या राजकीय इच्छाशक्तीमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या कळकळीचा विषय असलेले कलम ३७० हटले, असेही ते म्हणाले. सुशीलकुमार शिंदेंनी माफी मागावी भारतात दहशतवादी कॅम्प चालतात, या भारताचे तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानाचा उल्लेख करून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताची प्रतिमा मलीन केली आहे. त्याबद्दल सुशीलकुमार शिंदे यांच्यासह तत्कालीन पंतप्रधान मनमोहर सिंग, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. पात्रा म्हणाले, - कलम ३७० हटल्याने परिवारवाद, दहशतवाद संपणार असून, भ्रष्टाचार व परिवारवादी राजकारणाला अंकुश लागेल. - मोदी हे जागतिक नेते असून, भारताची प्रतिमा विश्वगुरू म्हणून स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. - नोटाबंदीनंतर सर्वाधिक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली, पाकिस्तानातून फुटीरतावाद्यांना मिळणारी रसद खंडित झाली. - राजकीय शक्तींनी कायद्याच्या शक्तींवर टिप्पणी करू नये.